Tuesday, August 18, 2009

संक्रमण

रविवारी सकाळी चहा घेत पेपर वाचत बसलो होतो. ही म्हणाली अहो, आज  आमच्या मंडळाची मीटिंग आहे बरं का! कॉलनीतल्या सगळ्या महिलांसाठी एक महिला मंडळ स्थापलेलं होतं. मंडळ कसलं याचं? गोंधळ नुसता! काही सामाजिक काम नाही की विधायक कार्य नाही. नुसत्या फालतू गप्पा, एकमेकांची उणी-दुणी किंवा पोकळ स्पर्धांचं आयोजन! स्पर्धांना तरी ऊत आला होता. स्पर्धा कसली? तर म्हणे, चपलांचा ढीग करायचा त्यातून नवऱ्याने बायकोच्या व बायकोने नवऱ्याचा चपलांची जोडी शोधून, जो पहिला पोचेल त्याला पहिले बक्षीस! काहीतरी निरर्थक.

एकदा शेजारचा सारोळकर आला व म्हणाला, "पेढे दे. " "कसले? " "अरे वहिनींना स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालंय. "

"अस्सं? कोणत्या? " मी आश्चर्याने विचारलं.

तो म्हणाला, 'वाद-विवादाच्या'.

हे ऐकून मात्र मनातून मी खजील झालो. या ऐवजी वक्तृत्वाच्या असत्या तर नक्कीच पेढे वाटले असते. पण हसत हसत म्हटलं, अरे खरं तर हे बक्षीस तिला फार पूर्वीच मिळायला हवं होतं. आमच्या घरात देखील तीच याचं बक्षीस पटकावते. काही का असेना, या स्पर्धेपासून ती मंडळाची सेक्रेटरी झाली होती एवढं खरं.

मी काही बोलत नाही हे पाहून ती म्हणाली, 'अहो ऐकलंत ना? '

'हे आता कोणत्या स्पर्धा ठेवणार? ' मी वाचत म्हणालो.

अय्या, तुम्ही कसे ओळखलंत?

तुमचं मंडळ दुसरं काय करतं?

नाही हं माझ्या हातात बॅट आहे तोवर मी चौफेर फटकेबाजी करणार आहे.

म्हणजे? मी म्हणालो.

अहो, मी सेक्रेटरी असे पर्यंत हो.

अगं पण प्रत्येक वेळा पाककलेच्या स्पर्धाच कशाला? कधी तरी मुलांसाठीही काहीतरी ठेवावं म्हणजे कथा-कथन, सामान्य ज्ञान, पाठांतर, राम-रक्षा, गीतेचे अध्याय, अशांनी बुद्धीला जरा चालना तरी मिळेल किंवा ज्या महिला खाण्याचा एखादा पदार्थ चांगला बनवितात तो मोठ्या प्रमाणावर करून अनाथाश्रम, अंधशाळांना वगैरे जाऊन अन्नदान करा. सत्कार्य तरी होईल.

जाऊ द्या हो. तसलं कटकटीचं काही नको बाई. मेल्या शिष्ट आहेत सगळ्या. कधी असला एखादा प्रस्ताव मांडलं की हात झटकून मोकळ्या होतात. पण पाककला स्पर्धा म्हणताच मधमाश्या सारख्या गोळा होतात.

हिच्या समोर काही बोलण्यात तसा अर्थच नव्हता. बरं मग. कोणते पदार्थ ठेवणार?

हे बघा रव्याचा गोड पदार्थ व तांदळाचा तिखट पदार्थ. चला ठरलं तर मग. आज जाहीर करते. हिचा हुरूप पाहून मी म्हटलं, असले उद्योग केल्यापेक्षा सुट्टीत मुलांचा अभ्यास घे जरा.

ते अभ्यासाचं तुम्हीच बघा बुवा. ती कार्टी काही माझं ऐकत नाहीत. एवढं म्हणून बाईसाहेब मोकळ्या झाल्या.

स्पर्धेचा दिवस ठरला, सगळा स्त्री वर्ग कामात गर्क झाला. मुले पिशव्या घेऊन बाजारात पळू लागली. प्रत्येकाच्या घरातून तेलकट, तुपकट, खमंग असा वास येऊ लागला. रव्याचे लाडू नि तांदळाची चकली असे हिचे पदार्थ ठरले. घरात रोज एक नमुना होऊ लागला. एक दिवस हिने डिश मध्ये सुरेख सजवून लाडू आणले. मी म्हटलं, अरे वा! सजावट तरी छान झालीय. आता चव बघू म्हणून लाडू खायला लागलो पण काही केल्या तो फुटेना. हे काय गं?

थांबा हं मी फोडते.

पण हिचाही जोर अपुरा पडला. मुले दातांनी चावून खायचा प्रयत्न करू लागली. शेवटी मंगेशनं जमिनीवर आपटून फोडला व साऱ्यांना खायला दिला. असले कडक लाडू तू स्पर्धेला ठेवणार? अगं हा लाडू इथून एखाद्याच्या अंगावर नेम धरून मारला ना तर तो जखमी होईल, पण तुझा लाडू तसाच राहील. माझ्या या वक्तव्यावर मुले खो खो हसू लागली. हिनं चिडून धाकट्याच्या पाठीत धपाटा घातला. त्याने भोकाड पसरलं. ही हिरमुसली. मी जरा समजावण्याच्या स्वरात म्हटलं, अगं चव चांगली आहे. फक्त जरा मऊ होतात का ते बघ. चकलीचं असं होऊ देऊ नकोस. हिने मान डोलावली.

स्पर्धेच्या दिवशी दुपारी दोनलाच मी घरातून पळ काढला व दुपारच्या पिक्चरला जाऊन बसलो. म्हटलं नसती कटकट नको. संध्याकाळी सहा-साडेसहाला आलो तेव्हा आमच्या कॉलनीतल्या कॉमन हॉल मधून जोरजोराचा आवाज येत होता. अरे , स्पर्धा सोडून हा कसला आवाज? म्हणून मी आत डोकावला तर हिचा व साठे वहिनींचा कडाडून वाद चालला होता. मी मंगेशला म्हटलं अरे काय झालं? बाबा, अहो बक्षिसाच्या  क्षुल्लक कारणावरून दोन गटांत जो वाद चाललाय तो केव्हाचा. कुणीच कोणाचं ऐकत नाही. दूरून श्रीमान साठे माझ्याकडे पाहत होते. अतिशय सज्जन गृहस्थ ! यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मी ठरविलं.

एकंदरीत वातावरण पाहिलं व मंगेशला म्हणालो, मंग्या अरे जोरात शिट्टी वाजव बरं. पडत्या फळाची आज्ञा! मंग्याने ती इतक्या जोरात वाजविली की त्या भांडणाऱ्या दोघींसह सगळ्यांनीच त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं. साऱ्यांचं स्पर्धेचं वेड लक्षात होतंच. मी म्हणालो, हे बघा मंडळी, सध्या जे काही चाललंय त्याला आपण या वादविवादाच्या स्पर्धाच आहेत असं जर समजलं तर त्याचं पहिलं बक्षीस कोणाला द्यावं असं तुम्हाला वाटतं? माझी ही कल्पना पाहून साठेंनी माझ्याकडे पाहत डोळे मिचकावले. मीही त्यांना प्रतिसाद दिला.

' स्पर्धा ' हा शब्द ऐकताच वातावरणाचा सारा नूरच पुन्हा बदलला. सारे एकदम शांत होऊन हलक्या आवाजात आपापसात कुजबुजे लागले. सध्याचे युग हे स्पर्धेचे अन त्यानिमित्ताने मिळणाऱ्या बक्षिसाचे आहे हे मला ठाऊक होते पण त्या स्पर्धांनी लोकांना इतकं वेडंपिसं बनवलं असेल याची मलाही कल्पना नव्हती. बहुधा माझा घाव अचूक लागला असावा. आता साहजिकच दोन्ही गटांतून विरुद्ध पार्टीची नावे येऊ लागली. पेच निर्माण झाला. नेमकं कोणाचं नाव जाहीर करावं कळेना. म्हटलं आता पुन्हा वाद सुरू होणार. एवढ्यात साठे हसत म्हणाले, 'शेळके, पहिलं बक्षीस दोघांनाही विभागून दिलं तर योग्यच होईल ना?' आणि ही कल्पना मात्र साऱ्यांनीच उचलून धरली. सगळीकडे हास्य -कल्लोळ पसरला. हिप हिप हुर्ये! मुलं दंगा करू लागली. साठेंनी अप्रत्यक्षपणे दोघींचीही उडविलेली खिल्ली घालून लगेचच त्यांनी घर गाठलं.

दुसऱ्या दिवशी हलक्या आवाजात ही मला म्हणाली, अहो, काल जे काही झालं ते व्हायला नको होतं ना? मी रात्रभर विचार केला. तुमचंच म्हणणं पटलं बघा आता. उगाच असल्या स्पर्धा घेऊन त्यात वेळ व शक्ती वाया घालवून, एकमेकींची मनं कलुषित केल्यापेक्षा स्पर्धेच्याऐवजी सर्वांनी मिळून सण-वार प्रसंग पाहून खाद्यपदार्थ बनवून एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा अंधशाळेला भेट देणं, अशिक्षितांना साक्षर करणं, संस्कार वर्ग यात रस घेणंच योग्य होईल. मग तर तुमची मदत होईल ना?     

मी स्वप्नात तर नाही ना म्हणून स्वतःलाच चिमटा काढून पाहिला व भानावर येऊन म्हणालो, खूप आनंद झाला बघ तुझे विचार ऐकून. अगं अशी जर कामं तुमचं मंडळ करेल तर कॉलनीतल्या साऱ्या पुरुषवर्गाचा पाठिंबा तुम्हाला मिळवून देईन याची खात्री बाळग. एक स्त्री, एका कुटुंबास जर नावारूपाला आणते तर अनेक स्त्रिया मिळून किती विधायक कार्य करू शकाल?

हो ना? ठरलं तर मग. मी आजच मीटिंग बोलावते असं म्हणत ही आत निघून गेली.

एका रात्रीत अफलातून वैचारिक संक्रमण झालेल्या माझ्या पत्नीकडे मी 'आ' वासून पाहू लागलो. कधी एकदा साहेबांना हे सगळं सांगेन असं झालं होतं. विभागून दिलेल्या बक्षिसाचे दुसरे दावेदार, म्हणजे त्यांच्या पत्नीचेही असेच मन-परिवर्तन झाले की काय? हे जाणून घेण्याची आतुरता लागली होती.

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

Thursday, August 13, 2009

घर! कुणाचं!

      होम, स्वीट होम ही कविता मी अगदी समरस होऊन शिकवीत होते. सारा वर्गसुद्धा तितक्याच तन्मयतेने ऐकत होता, अन् तास संपल्याची घंटा झाली. सारेचजण कल्पनेतून जागे झाले. मी बाहेर पडले. आज प्रकृती बरी नसल्याने पुढचे तास न घेताच मी घरी जायचं ठरवलं व निघालेही.

      निघाले खरी पण कवितेतील घराबद्दलच्या कवीच्या कल्पना मात्र माझ्या मनातून जात नव्हत्या. घर! सृष्टीतील प्रत्येक जीवाचं आपल्या जीवा इतकंच प्रेम असतं ते स्थान! सर्वांना हवाहवासा वाटतो तो निवारा! अगदी जीवापासून  शिवापर्यंत निगडित असलेल्या घराबद्दल आपलं मन जर विचार न करील तरच नवल!

पाउले घराच्या ओढीनं स्पर्धा करीत होती तर मन कवितेच्या संदर्भाने अभिप्रेत असलेल्या घराच्या रम्य अशा कल्पनेची आणि मी प्रत्यक्ष अनुभवत असलेल्या माझ्या घराची तुलना करीत होते. डोळ्यासमोर आतापर्यंतचा तेरा-चौदा वर्षाचा गतकाल सरकत होता.

  पाच - सहा माणसांचं आमचं कुटुंब! आम्ही दोघे म्हणजे, मी व शेखर, आमची दोन मुलं. सासू - सासरे आणि दीर. पैकी मी व शेखर घरातले कमावते. खरं तर प्रत्येक बाबतीत मी शेखरच्या बरोबरीने कष्ट करीत होते पण का कोण जाणे या घरात माझी मलाच कुठेतरी उणीव भासायची, कमीपणा जाणवायचा. समाधान वाटत नव्हतं. घरातील इतर सर्व कामं सांभाळून नोकरी करायची शिवाय नवऱ्याची मर्जी सांभाळायची. एवढं सारं करून देखील मनाला असं वाटायचं की घरात वर्चस्व मात्र शेखरचंच! ते म्हणतील तिच पूर्वदिशा. यामुळेच  हे रितेपण जाणवत होते की काय कोण जाणे. मग मनात वादळ उठे की का? कशासाठी एवढा आटापिटा? कोणासाठी एवढी झीज? ह्या लोकांसाठी की घरासाठी? घर? कोणाचं? याचं की माझं?

मध्यंतरी दिराचं लग्न झालं. मर -मर कष्ट केले नावं आणि कौतुक मात्र शेखरचंच! लग्नानंतर हे नवीन जोडपं त्यांच्या नोकरीच्या गावी गेलं अन पुढं काही दिवसातच सासूबाईंनी अंथरूण धरलं. संपूर्ण दिवस सगळी कामं उरकेपर्यंत अगदी नाके नऊ यायचं. पण इलाज नव्हता. पुढे महिन्याभरातच त्या गेल्या. सर्वांना सोडून.

     आता घरची सगळीच जबाबदारी माझ्यावर आली. पुढे दीड - दोन वर्षातच सासरेपण गेले. घर अगदीच रिकामं झालं. आता आम्ही चौघेच. दिनक्रमात बदल नव्हता. प्रत्यक्ष व्यावहारिक किंवा कौटुंबिक बाबतीत मात्र माझ्या अस्तित्वाची जाणीव कोणालाच नसे. त्यामुळेच मनात खोलवर कुठेतरी वेदना सलत असावी. असं का व्हावं? कुठे कमी पडते मी? माझ्याच घरात परकेपणाची भावना का रुजावी? व अशा विचारांनी मनाला अस्वस्थ का करावं हेच कळत नव्हतं. पुरूषप्रधान असलेल्या या संस्कृतीत सर्वच मध्यमवर्गीय स्त्रियांची माझ्यासारखीच अशी मानसिक घालमेल होत असावी का? आणि असेलच तर आजच्या कवितेतील रम्य कल्पना व अनुभव यांचा वास्तविक मेळ नसावाच का?

विचारांच्या ओघात घर जवळ आलेलं कळलंच नाही. नाजूक प्रकृती व मनाला अस्वस्थ करणाऱ्या विचारांनी डोकं ठणकत होतं. दुसरे दिवशी अंगात ताप पण भरला. घरगुती औषधाने अंगात ताप तसाच मुरलेला असावा. उतरायची चिन्हे दिसेनात. मग साऱ्या तपासण्या केल्या. निदान येईपर्यंत तापाची सुरुवात होऊन चार दिवस झाले होते. कमालीचा अशक्तपणा आला होता. शेखरच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. काय झाले कोण जाणे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने मला लगेच दवाखान्यात ऍडमिट केलं. आता सगळी जबाबदारी शेखरवर येऊन पडली. त्यांची खूप तारांबळ होऊ लागली. घरचं, मुलांचं, दवाखान्यात माझ्याकडे येऊन बसणं, सगळं सगळं त्यांनाच पाहावे लागे. सुरुवातीला पंधरा दिवसांची रजाच घेतली होती. मला पूर्ण विश्रांतीच होती. शेखर माझी फार काळजी घेत. सगळं वेळेवर व स्वतः करीत, जागरण, दगदग व काळजीने त्यांचा चेहरा ओढल्यासारखा झाला होता. रोज रात्री दवाखान्यात झोपावं लागे त्यामुळे झोपही नीट होत नसे. एरव्ही जागरणाने चिडणारे शेखर आता मात्र शांत होते. आजारपणात त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू मला नव्याने पाहावयास मिळत होते.

हळू हळू माझी प्रकृती सुधारू लागली. कालचाच प्रसंग. मी त्यांना म्हटलं, "अहो, किती थकलात? थोडीशी विश्रांती घ्या. आता मी बरी आहे. माझी काळजी नका करू. " तसे ते हसत म्हणाले, 'अगं मी तर माझीच काळजी घेतोय. हे बघ, स्त्री म्हणजे घराचा आधार! संसारातला पुरुषाइतकाच महत्त्वाचा घटक! जमिनीत खोलवर रुजलेलं घट्टं मूळ! अगं झाडाचं मूळ सशक्त असलं म्हणजेच ते बाहेरच्या वादळवाऱ्याशी हिमतीनं झुंज देत राहतं. तेव्हा तू लवकर बरी हो बरं. आपल्या घराचा पायाच नाही का तू? तो पाया अदृश्य असला तरी संसाराची इमारत त्यावरच उभी नाही का? आणि आतापर्यंत या आपल्या घरासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव का नाही मला? त्यासमोर माझे हे कष्ट काहीच नाहीत. तेव्हा आता कसलाही विचार न करता तू स्वस्थ झोप पाहू. घरी जाण्याची परवानगी लवकरच मिळेल. '

काल शेखरने झोपायला सांगितले खरं पण माझी झोप मात्र पार उडून गेली. त्यांच्या आचरणातील सुप्त ओलावा मला स्पष्टपणे जाणवू लागला. कदाचित पुरूषप्रधान संस्कृतीतल्या 'पुरुषी' स्वभावामुळेच त्यांनी कधी आपल्या भावना व्यक्त केल्या नसाव्यात का? 

खरंच! या दिशेने मी कधी विचारच केला नाही. गुरफटलेल्या संसारात मला जमेल तितकं केलं, जमत नव्हतं तिथे तडजोड केली खरी, पण तडजोडीच्या सामंजस्याच्या जोडीला शेखरचा मूक प्रतिसाद होता म्हणूनच संसाराची इमारत उभी राहू शकली ना? माझ्या संकुचित स्वभावामुळेच मी माझ्या अस्तित्वाबाबतची चुकीची कल्पना करीत असल्याची मला जाणीव झाली. माझ्या मनातले विकल्प पार धुऊन निघाले. मन हलकं हलकं झालं अन् कधी झोप लागली कळलं देखील नाही. पुढे दोन दिवसातच घरी आले. पाहते तो...

दारावर हिरव्यागार पानांचं तोरण बांधलेलं होतं. दोन्ही मुलांच्या हातात 'सुस्वागतम्' व 'Welcome Home' अशा अक्षरांचा कागद होता. सारेच जण समाधानाने व आनंदाने हसत होते. माझं ऊर भरून आला. डोळे भरून वाहू लागले. शेखरच्या आधाराने मी घरात प्रवेश केला. सगळ्या घरावरून नजर फिरवली तर घरातील प्रत्येक वस्तू माझ्याकडे प्रेमाने, आपुलकीने पाहते असाच भास झाला. छे, इतके दिवस उगाच 'त्यांचं - माझं' असा खुळा विचार मी करायची. शेखरच माझे म्हणजे त्यांचं ते माझंच नव्हतं काय? द्वैतातून अद्वैत असं काहीसं म्हणतात ते याहून काय निराळं असावं?

बस्स! आता असले संकुचित विचारच बंद. आता लवकर बरं व्हायचं. पुन्हा नव्या उभारीनं संसाराला लागायचं. वर्गामधली "Home Sweet Home" ही कविता पूर्ण करायची, पण वेगळ्या अर्थानं! कारण त्या कवितेतील मधाळपणा आता मी माझ्या घरात चाखला होता त्यामुळे मन म्हणत होतं की अगं वेडे, घर कोणचं? हा प्रश्न मनामध्ये का आणतेस? घर तर दोघांचं!

विचारांची दिशाच आपल्या जीवनाचा चेहरा-मोहरा पार बदलून टाकतात. यावर विश्वास ठेवून त्यास प्रतिसाद दिला तर विश्वातील सर्वांचीच घरे सुखी होऊ शकतील नाही का?

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

Tuesday, August 11, 2009

राखी पोर्णिमेनिमित्त कविता

हिरवी अवनी सूचीत करते
श्रावण मासाची
श्रावण हळूच वरदी देतो
राखी पुनवेची

लगभग धांदल एकच उडते
साऱ्या बहिणीची
राखी धाडण्या भाऊराया
माया ममतेची

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

Monday, August 10, 2009

सेतू

दारावरची बेल वाजली अन पाठोपाठ पोस्टमन अशी हाक ऐकून दुर्गाकाकूंनी लगबगीनं दार उघडलं. अपेक्षेप्रमाणे मोहनचंच पाकीट होतं. झोपाळ्यावर बसत त्यांनी पाकीट उघडलं, पाहते तो आत मंजिरीचं मोठं पत्र होतं. सूनबाईचं पत्र पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं. त्यांनी वाचायला सुरू केली.

ती. सौ. आईंना,

शि. सा. न. वि. वि.

आपणा सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन आम्ही इकडे सुखरूप पोहोचलो. बदलीचं गाव, माणसं, वातावरण, सारंच नवीन. सगळं लागतंदुकतं होईपर्यंत दीड दोन महिने कसे उलटले समजलंच नाही. त्यात लग्नापासून कोणतेच काम स्वतंत्रपणे व जबाबदारीनं केलं नसल्यानं साध्या साध्या गोष्टीत सुद्धा वेळ जास्त जायचा.

आई, तिकडून निघताना बदलीच्या निमित्तानं का होईना, कथा-कादंबऱ्यांत वाचलेल्या विचारांप्रमाणे व प्रचलित संकेताप्रमाणे राजा-राणीच्या स्वतंत्र संसाराची गुलाबी स्वप्नं रंगवीत इकडे आले खरी, पण इथे आल्यानंतर प्रत्यक्ष संसार उभारताना व चालवताना 'कल्पना' व 'सत्य' यातील अंतर जाणवू लागलं. स्वातंत्र्याच्या नावाखाली वेगळं राहायची जी आजकाल फॅशन झाली आहे ती खरोखरच फायदेशीर आहे का? याचेच मन विचार करू लागलंय.

एकटीन्ं संसार करणं म्हणजे तारेवरची कसरतच! घरचं, बाहेरचं, पाहुणारावळा, आजारपण, खर्चाचं बजेट, छे, छे, छे, किती व्याप! तेही सारं एकट्यानं सांभाळायचं? कोण ओढाताण होते जीवाची! अन याची प्रकर्षानं जाणीव झाली ती माझ्या मामांच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला त्यावेळी! ते ४-५ जण, सगळेच दवाखान्यात. त्या साऱ्यांचं पथ्यपाणी, खाणं पिणं, त्यांचा पाहुणा सारं सांभाळेपर्यंत माझी काय त्रेधा उडाली असेल ते शब्दात सांगू शकायची नाही आई. कारण आजवर एकटीनं कधीच काही केलं नव्हतं त्यामुळे कधी नाश्ता बिघडे, तर कधी स्वयंपाक, कधी अपुरं पडे तर कधी वाया जाई. रोज एक तऱ्हाच! त्यात आमचं पाकशास्त्रातलं ज्ञान म्हणजे अगदीच अननुभवी अन परावलंबी! तरी बरं त्यातल्या एकदोघांच्या बायका माझ्याकडे आल्यामुळे ती वेळ निभावली. पण अशा परावलंबनाची मात्र माझी मलाच शरम वाटली. एक स्त्री असून अशा साध्या गोष्टी मला येऊ नयेत?

खरं सांगू आई, तुमची मात्र तीव्रतेने आठवण होई. लग्नानंतर संपूर्ण वर्ष तुमच्यासारख्या सुगरणीच्या सहवासात घालविला पण धड एक काम मन लावून शिकले नाही. आता मात्र मनोमन निश्चय केला की सारं तुमच्याकडून शिकायचं. तुमची शिस्त, माया, साऱ्यांना आग्रहाने खाऊ घालणं, प्रसंगी कर्तव्यदक्ष राहून कानउघाडणी करणं, प्रापंचिक जबाबदाऱ्यांची जाण! किती गोष्टी सांगू? मला हे सारं शिकायचंय. आई मला सारं हक्कानं शिकवा व रागावासुद्धा! खरं तर हे सारं लग्नाआधीच शिकायला हवं होतं. पण शिक्षण, एतर क्षेत्रातला सहभाग, नोकरी व करिअरसाठीची वृथा धडपड, या साऱ्यात घरातलं पाहायला वेळच नसायचा. खरं सांगायचं तर त्यास गौण महत्त्व देऊन वेळ दिलाच नाही. पण सुखी संसारासाठी त्या साऱ्यांइतकंच हे गरजेचं आहे हे आता कळू लागलंय. असो.

तुम्ही व ती. बाबा कसे आहात? इकडे चार भिंतीत कोंडल्यासारखं होतं. शहरी संस्कृती - ना आपलेपणा ना मायेची ऊब! जो तो जीवन जगण्यापेक्षा जीवन रेटतोय असंच वाटतं. त्यामुळे मनाची तगमग होते व एकटेपणा जाणवतो. असो. बाकी तसं क्षेम. पत्र लिहा. तुमचा आशीर्वाद हवाय.

तुमची आज्ञाधारक,

सौ. मंजिरी

दुर्गाकाकूंनी पत्र संपविलं व पदराने डोळे पुसले. त्यांना वाटलं आपलंच चुकलं. पोरीबरोबर सोबतीला जायला हवं होतं. पण इथला पसारा टाकून जाणं शक्य नव्हतं. अन् कधी वाटायचं, दोघांत तिसरीची अडगळ, असं नको व्हायला. मंजिरीच्या चालू अवस्थेचं वाईट वाटलं, पण मन मात्र सुखावलं. संसाराच्या जबाबदाऱ्यांची लवकर जाणीव झाली होती. मातीचा गोळा अजून ओला होता. आता त्याला हवा तो आकार आपण देऊ. पेन कागद घेऊन त्या पत्राचं उत्तर द्यायला बसल्या.

चि. सौ. मंजिरीस,

प्रेमळ आशिस.

तुझं पत्र आत्ताच मिळालं. मजकूर व खुशाली समजली. तुमच्याच पत्राची वाट पाहत होते.

संसार व जबाबदाऱ्यांबद्दल तू जे काही लिहिलंस ते खरंच आहे. पोरी नेटका संसार करणं ही सुद्धा एक कला असते. खरं म्हणजे स्त्रीला ती निसर्गतःच अवगत असते. परंतु ती लिहुन-वाचून समजणं अवघडच. त्याला प्रत्यक्ष अनुभवच फायदेशीर ठरतो. तू पत्रातून जे माझ्याबद्दल लिहिलंस ती जाण येण्यासाठी परिस्थितीनं तावून सुलाखून निघावं लागलं. यावरून मला माझं पूर्वायुष्य आठविलं. पोरवयात लग्न झालं. असून अंगाची हळद ओलीच होती. तोवरच सासूबाईंनी जे अंथरूण धरलं ते त्यातून त्या उठल्याच नाहीत. मामंजी नव्हतेच. परिस्थिती बेतातीच. मग त्यांनी अर्धवट शिक्षण सोडून कारकुनी सुरू केली आणि मी पोळीभाजीचे डबे. लग्नाची नवलाई, हौस, मौज वगैरीचा विचार करायला उसंतच नव्हती. तशातच मोहनचा जन्म झाला. त्याचं संगोपन, शिक्षण.. प्रतिकूल परिस्थितीच्या थपडा खात जिद्दीनं संसार केला. पण त्यातदेखील एक ऊर्मी होती. स्वतः काहीतरी केल्याचं समाधान होतं. मोठ्या कष्टानं आज सारं नावारूपाला आलंय खरं. पण त्यामागील जी अनुभवाची शिदोरी आहे त्याच्या साहाय्यानेच मी तुला तयार करणार आहे.

अगं खरं म्हणजे मुलींना शालेय, यांत्रिक शिक्षण जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच प्रापंचिक शिक्षण गरजेचं असतं हे आईंनी व मुलींनी जाणून घेतलं पाहिजे. हल्लीच्या बहुतांशी मुलींना संसारापेक्षा आपलं करियर महत्त्वाचं वाटतं. घरात काय टाइम वेस्ट करायचाय? हा प्रश्न त्या विचारतात. करियर तर निश्चितच महत्त्वाचे आहे, पण कुटुंबाशी जवळीक साधून कुटुंब सुखी करायचं असेल तर थोडासा टाइम वेस्ट करायलाच हवा, नाही का? अगं कुटुंबात आपलेपणा निर्माण करणं, एकमेकांना मायेच्या धाग्यांनी एकत्र बांधणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी  होणं हीच तर खरी सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे व जी स्त्री या आधारे संसार समर्थपणे सांभाळते तीच आपल्या कुटुंबाला ऊर्जितावस्थेत नेऊ शकते आणि एकदा घरची घडी व्यवस्थित बसली की मग घरचं सांभाळून बाहेरची क्षेत्रं सांभाळणं फारसं अवघड नसतं. उलट प्रत्येक घटकाचा पाठिंबाच मिळतो. पण त्यासाठी दोन्ही पिढीत सुसंवाद व सामंजस्याचा भक्कम सेतू हवा. कोणत्याही बाबतीत कमीपणा न मानता मुलींनी/सुनांनी मोकळ्या मनाने विचारायला हवं व तेवढ्याच मायेने, हक्काने आईने/सासूने तिला सांभाळून घेत, एकमेकींना समजून घेत सारं शिकवायला हवं.

मंजू, संगणक युगातल्या मुली तुम्ही! अभिमान वाटावा अशा प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्या व निपुण. अगदी अंतराळातसुद्धा झेप घेतलीय. मग जरा अंतःकरणात डोकावून पाहत याही क्षेत्रात निपुण झालात तर खऱ्या अर्थाने जीवन यशस्वी व सुखमय नाही का होणार? प्रत्येक क्षेत्रांतलं नैपुण्य व स्वयंपूर्णताही वैयक्तिकरीत्या तर फायद्याची व भूषणावह असतेच पण ती कौटुंबिक व सामाजिकदृष्ट्याही फलदायी ठरते. हे सारं अवघड नसतं. फक्त जिद्द व समजूतदारपणा हवा एवढंच. तू काळजी करू नकोस. स्वभावातला लवचिकपणा व मोकळेपणा हाच तुझा मोठा गुण आहे याची जाणीव पत्रातून व अनुभवातून झालीच आहे. तेव्हा यशस्वी होणारच. उलट दोन पिढीत सेतू बांधताना माझ्याकडून काही उणीव राहू नये याच धडपडीत मी राहीन, याची खात्री ठेव. मोहनला प्रेमळ आठवण.

तुझी,

सौ. आई.

दुर्गाकाकूंनी पत्र पूर्णं केलं व रघूस पोस्टात टाकायला सांगून समाधानी मनाने झोपाळयाचे झोके घेत विचारात गढून गेल्या. त्यांना वाटलं प्रत्येक तरुणीने जर मंजिरीसारखा विचार केला तर...

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========