Saturday, December 14, 2013

स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे काय?

"स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे काय?” या विषयावरील निबंधस्पर्धेतील निबंध.

==========================================================

स्त्री! विश्वकर्त्यानं आपल्या कुंचल्यानं चितारलेलं अतिशय लोभस चित्र! या स्त्रीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात असलेली प्रजनन शक्ती; जी अन्य कोणामध्येही नाही. हिचं विश्वरूप म्हणजे मातृत्व! अशा विविध गुणांनी नटलेली स्त्री साहजिकच आपल्या आपल्या अस्तित्वाला खूप जपत असते. नेहमी साऱ्यांवर मायेची पाखरण करीत असली तरी जेव्हा तिच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र ती आक्रमक बनते. अगदी सायाळ प्राण्याप्रमाणे. एरव्ही शांत असलेला हा प्राणी त्याला कुण्या शत्रूची नुसती चाहूल जरी लागली तरी आपल्या अंगाभोवतीचं काटेरी कवच फुलवून प्रतिकारासाठी सज्ज होतो. तशीच स्त्री पण सज्ज होते. त्यातून तिचे गुण-दोष प्रगट होतात. तिच्या स्वभावातल्या विविध छटा पाहायला मिळतात. तसं तिचं व्यक्तिमत्त्व अनाकलनीयच! प्रसंगी जीवाला जीव देईल तर प्रसंगी कालीमातेचं रूप धारण करून दुष्टांचा संहारही करेल. पण तरीसुद्धा मला वाटतं की, हिला बहुधा निसर्गाचा शाप असावा. कारण एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या सहवासात येते तेव्हा इतर भावनांपेक्षा वैरत्वाची भावनाच तिच्यात असल्याचे आपणास प्रकर्षाने जाणवते.

अगदी रोजचेच पाहा ना, तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलाला सांभाळून, वाढवून, पुढे मोठ्या हौसेनं त्याचं लग्न लावून सून घरी आणते. पण नव्याची नवलाई सरली की साध्या साध्या कारणांवरून मतभेदाला सुरुवात होते. आईला स्वतःच्या मुलाच्या प्रेमात वाटेकरू नको असतो, तर सुनेला नवऱ्याच्या प्रेमात वाटेकरू नको असतो, किंबहुना दोघींनाही कोणत्याच क्षेत्रात आपला वाटेकरू नको असतो. सासूला वाटतं की इतकी वर्षे या घरासाठी, कुटुंबासाठी झिजले, झटले; हे घर नावारूपाला आणलं. त्यामुळं या घरावर माझीच सत्ता/हुकुमत हवी. सुनेचा शहाणपणा तिथं नकोय. अन् इकडे सुनेला वाटतं की माझं सारं सोडून नवऱ्यासाठी या घरात आले तेव्हा हे सारं माझ्याचं हक्काचं आहे. आता इथं माझ्या तंत्रानंच सारं घडायला हवं. तिथं मधेमधे सासूबाईंची लुडबूड कशाला? इतके दिवस त्याच होत्या ना? अशा प्रकारे दोघीही स्वतःचं अस्तित्व जपण्यात घराचं घरपण हरवून बसतात व एकमेकांपासून दुरावतात.

तसेच लग्नापूर्वी आपुलकीने व एकमेकींच्या ओढीने राहत असलेले भाऊ लग्नानंतर एकमेकांपासून दूर जातात. याला जबाबदार स्त्रियाच असल्याचं बहुतांशी आढळून आलेलं आहे. म्हणजे सासू-सुनांतील कलहामुळे पुत्रप्रेम दुरावते तर जावांच्या स्वार्थी-अहंकारी वृत्तीमुळे भाऊ भाऊ दुरावतात.

हे कौटुंबिक जीवनात घडतंय, तर सामाजिक पातळीवर सुद्धा आपण पाहतो की, एखाद्या लाचार, असहाय्य मुलीला फसवून तिला कुमार्गाला लावून किंवा तिची विक्री करून स्वतःची खळगी भरणारी स्त्री ही स्वार्थीच म्हणावी लागेल. बरं अशा पतीत स्त्रियांचा उद्धार करायचं म्हटलं तरी किती स्त्रियांचा प्रतिसाद मिळेल? नगण्या! अगदी माझ्या सहित...

हे शत्रुत्व फक्त वर्तमान काळातच आहे असं नाही, तर रामायणात, पेशवाईत, शिवकालीन युगात जरी डोकावलं तरी चित्र काय फारसं निराळं असेल असं नाही. फक्त स्वरूप वेगळं होतं एवढंच. स्वराज्याच्या संस्थापकाला घडविणाऱ्या जिजाऊंची मतप्रणाली महाराणी सोयराबाईंना जाचक वाटून त्यांच्यात मत-भिन्नता असल्याचे दाखले इतिहासात आढळतात. पेशव्यांच्या घराण्यांतील 'ध' चा 'मा' करणारी आनंदीबाई! केवळ ते पोर जावेचं होतं म्हणून हे वैर. रामराज्यात कौशल्येचा पुत्र राम, म्हणजे सवतीचा मुलगा गादीवर नको असे कैकेयीला सुचविणारी मंथरा, एका स्त्री बद्दल दुसऱ्या स्त्रीच्या मनात विष पेरते व त्यास्तव कैकेयी रामाला १४ वर्षे वनवासात पाठविते. इथली गंमत तरी पहा, की मंथरेचा स्त्रीद्वेष तर कैकेयीचा सवती-मत्सर! म्हणजे कोणत्याही दृष्टिकोनातून किंवा नात्यातून पाहता सगळीकडे शत्रुत्वाची भावनाच प्रामुख्याने दिसून येते.

याही पलीकडे जाऊन अत्यंत अमानुष व घृणास्पद कृत्य म्हणजे स्त्रीभ्रूणहत्या! ही गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते. कितीही नाही म्हटलं तरी १०० पैकी ९५% स्त्रियांना/मातांना/सासवांना मुलगाच हवा असतो. परिणामी जल-परीक्षण करून मुलीची हत्या होते. अगदी कायद्याने बंदी असूनसुद्धा! अर्थात आधीपेक्षा आता याचं प्रमाण कमी झालंय. पण ते पूर्णपणे थांबावं असं वाटतं. वरचेवर मुलींच्या संख्येच्या टक्केवारीत घट होत असल्याचंही आढळून आलंय. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तरी हे बंद व्हायला हवं.

थोडक्यात, आज इतका काळ लोटला, स्त्री प्रगत झाली, तिची प्रत्येक क्षेत्रातली घेतलेली गरूडझेपही अत्यंत कौतुकास्पद आहे. तरी तिच्या स्वभाव-गुणांत फारसा फरक झाला असावा असं वाटत नाही.

तर... एकंदरीत कौटुंबिक जीवनातलं तिचं अस्तित्व पाहिलं जसं - सासू-सुना, जावा-जावा, नणंद-भावजया, सवती-सवती, प्रसंगी बहिणी-बहिणी सुद्धा - इथं स्त्रीचं खुजंपण दिसतं. सामाजिक जीवनात म्हणजे तिला कुमार्गाला लावणं, वेश्या बनविणं वगैरे इथं स्त्रीचा स्वार्थ दिसतो. तर ऐतिहासिक किंवा राजकीय पातळीवर पाहिल्यास तिथेही तिचा अहंकार आणि खोटी प्रतिष्ठा हीच तिच्या शत्रुत्वाला कारणीभूत असल्याचे आढळून येते.

हे सारे नमूद करताना मनस्वी खेद होतो. पण त्यामुळे वस्तुस्थितीत तर बदल होत नाही ना? खेदानं का होईना स्त्री ही स्त्रीची शत्रूच आहे असच म्हणावी लागेल. तरीपण भाबडं मन आशा करतं की कालांतरानं का होईना बुद्धिवाद, व्यवहार व सम्यक ज्ञानाच्या आधारे हिच्यात बदल होत गेला तर किती बरं होईल, नाही का?

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

Saturday, March 27, 2010

असे घडवू मुलांना!

मुलं ही पालकांची-समाजाची व पर्यायाने राष्ट्राची संपत्ती!  त्यांना घडविणं ही आपली नैतिक जबाबदारी! पण, त्या आधी आपल्याला स्वतःला घडावं लागेल, नाही का? सद्य परिस्थितीत तरी याचा अंतर्मुख होऊन विचार होणं गरजेचं झालंय. कारण आडात असेल तरच पोहऱ्यात येईल. नाहीतरी मूल म्हणजे आपलं प्रतिबिंबच असतं ना? आपण जसं बोलू-वागू तसंच ते शिकतं.

त्यांना वळण लावण्याचा योग्य काळ म्हणजे बालपण. खरं सांगू का? हे वय म्हणजे एक कोरी पाटी असतं. काळं भोऽऽर रान असतं. फक्त मशागत करून चांगलं बी पेरायची गरज असते. फक्त या बिया कधी व कशा पेरायच्या हे आपण पालकांनी ठरवायचं. कारण पेरू तेच उगवणार हा तर निसर्गाचाच नियम आहे.

त्यांना घडविण्याच्या ज्या ज्या सवयी, संस्कार व शिक्षण असतं, त्या साऱ्यांची सुरुवात आपण आपल्याच घरापासून सुरू करावी असं मला वाटतं. कारण घरांत जे चालतं-घडतं त्याचं निरीक्षण मूल करतं, व त्या निरीक्षणांतूनच ते सगळ्या गोष्टी आत्मसात किंवा अनुकरण करीत असतं. मुलं ही अनुकरणप्रिय असतात. म्हणून आपण स्वतःच लवकर उठणं, व्यायाम करणं, वेळेवर अभ्यास घेणं, खाण्याच्या सवयी, खेळ इत्यादी, जे जे आपल्याला त्यांच्याकडून हवंय त्याची कृती आपल्यापासून सुरू व्हायला हवी; तरच ते त्यांच्या मनावर विनासायास बिंबलं जातं. मुद्दाम काहीच शिकवावं लागत नाही.

आता सवयींबद्दल बोलायचं झालं  तर सुरुवातीला साध्या साध्या गोष्टी, जशा - पहाटेची प्रार्थना, मोठ्यांना नमस्कार, शुद्धलेखन, पाढे, एखाद्या सुभाषिताचं पाठांतर, योगासन, प्राणायाम यापैकी कोणताही एखादा- दुसराच नियम ठरवायचा व त्याचं पालन त्यांना करायला लावायचं, किमान वर्षभर तरी! फक्त एकच की, त्यात सातत्य हवं. तिथं एकाही दिवसाची सूट द्यायची नाही. कारण एकदा का सूट घ्यायची सवय लागली की यश 'सुटलंच' समजायचं. या बहरण्याच्या वयातच नियमांचा कानमंत्र आई-बाबांनी मुलांना द्यायला हवा, आणि एकदा का नियमितपणाची सवय लागली की पुढं फारसं अवघड जात नाही.

अभ्यासामध्ये पाढे व शुद्धलेखनाची सवय आवर्जून असावी. त्यामुळे भाषा व गणिताचा पाया पक्का होतो. याच बरोबर पाठांतराची सवय असणं गरजेचं आहे. पाठांतराच्या छोट्या छोट्या स्पर्धांमधून भाग घेतल्यास ही सवय आणखीनच वाढेल. हल्ली तसा मुलांना बराच वाव मिळतो. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती तर वाढतेच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेत नंबर जरी आला नाही तरी 'नकार' पचविण्याची ताकद मुलांमध्ये रुजते कारण प्रत्येक वेळी पहिला नंबर येऊ शकत नाही. हे आजच्या स्पर्धेच्या युगात अत्यंत महत्त्वाचं आहे.

याचप्रमाणे व्यायामातसुद्धा जसे, सूर्यनमस्कार, पोहणे, सायकलिंग, फिरणे, मैदानी खेळ काहीही असो, त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे वाव द्यायला हवा. व्यायामाचं महत्त्व या वयात कळलं तर आयुष्यभर निरोगी जीवन जगू शकतात.

खाणं! मुलाचं खाणं-पिणं म्हणजे आजकाल आईच्या डोक्याचा ताप होऊन बसलाय. खरं तर स्वयंपाकघर म्हणजे धन्वंतरी! पूर्वी दहाजणांत मूल आपसूकच जेवून निघायचं, पण हल्ली फाजील स्वातंत्र्यामुळे मनस्ताप वाढलाय. तरी सुद्धा आहाराचं महत्त्व कृतीतूनच पटवावं लागेल. रोजचा सकस आहार, साधं जेवण - पोळी-भाजी, वरण-भात, कोशिंबीर वगैरेचीच सवय रोज असावी. पण आठवड्यातून एक-दोन दिवस मुलांच्या आवडींना वाव दिल्यास खूप फायदा होतो. जसे - चल, आज तुझ्या आवडीचं सांग, मी बनवेन. त्यांनी मुलंही खूश व आपणही...

आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे "स्वावलंबन"! स्वावलंबनाची सवय लागेपर्यंत जरा अवघड वाटतं, पण त्याच्या सारखा आनंद कशात नसेल. स्वतःची कामं स्वतःच करण्यात काहीच कमीपणा नसतो हे आधी आपण स्वतः कृतीने त्यांच्या लक्षात आणून द्यावं. एकदा का याची सवय लागली म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे मुलांना ते जड जाणार नाही.

अर्थात या साऱ्यांसाठी आईनं जातीनं मुलांकडे लक्ष द्यायला हवं. वेळ काढायला हवा. गृहिणी असतील त्यांना हे सारं जमेल पण ज्या नोकरी करतात अशांची ओढाताण होते. अशावेळी मुलांच्या बाबांनी मदत करायला हवी. तरीसुद्धा आईनं काही काळापुरतं का होईना आपल्या करियरमध्ये थोडीशी तडजोड करून मुलांमध्ये समरस व्हायला हवं. कारण हे वय विकासाचं, सवयींचं व फुलायचं असतं. नाहीतरी मुलांना घडविणं हे आपलं सर्वात मोठ्ठं करियर नाही का? आपल्याला सजीव पुतळे घडवायचेत. घरात कुणी नसल्याने मुलांना देखील एकटेपणाची जाणीव व्हायला लागते. बऱ्याचदा नको त्या सवयी लागण्याचीही शक्यता असते; परिणामी नैराश्य येऊ शकतं. आपल्या असण्यानं या गोष्टी टळू शकतात.

मुलं आणखी मोठी झाली, बाहेरच्या जगात वावरायला लागली म्हणजे आणखीनच जबाबदारी वाढते. त्यांची मित्रमंडळी, त्यांच्या सवयी, त्यांचं खाणं-फिरणं, ह्यावर तर अगदी बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं. या वयात मित्रत्वाची भावना ठेवून त्यांना विश्वासात घेतल्यास त्यांच्याशी संवाद साधणं सोपं जातं. आणि चुकून एखादी समस्या उद्भवलीच तर सोडवणं फारसं कठीण जात नाही.

वय वाढेल तसं त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी. योग्य ते स्वातंत्र्य द्यायलाच हवं, कारण त्यांना काळाच्या ओघाबरोबर वाहायचं असतं; पण फाजील स्वातंत्र्य किंवा बंधनं नकोत. पॉकेटमनी गरजेपुरती ठीक आहे पण चैनीसाठी नको. कारण चैनीचं रुपांतर व्यसनांत कधी होईल हे समजत नसतं. हे वय चंचल असतं. व्यसन हे विनासायास जडतं तर चांगल्या सवयी या आवर्जून लावून घ्याव्या लागतात.

याचवेळी व्यवहारज्ञानासाठी त्यांना बाजारहाट, खरेदी-विक्री सारख्या गोष्टी करू द्याव्यात. म्हणजे सद्य-परिस्थितीची जाणीव त्यांना होते.

सुट्ट्या मिळाल्या की हल्ली टूरवर जाण्याचे बेत आखले जातात. तशा टूरमध्ये एखादी सहल बाबा आमटेंसारख्यांच्या प्रकल्पाला गेली तर विपरीत परिस्थितीत सुद्धा दीन-दलितांची सेवा कशी करावी हे दाखवून देता येईल. नाहीतरी दुःख जाणण्याच्या प्रकियेतुनच माणूस घडत जातो. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या जडण-घडणीत खूप मोलाच्या ठरतात.

एव्हाना मुलांना बराच आकार आलेला असतो. मग मात्र त्यांना भरारीसाठी आकाशात सोडून द्यायचं. त्यांच्या पंखात बळ येण्यासाठी! जसजसे ते उंच भरारी घेतील तसतसे त्यांच्या पंखात बळ येईल. उंच भरारी ही त्यांनी घ्यायलाच हवी त्याशिवाय त्यांना गगनाचा रंग कसा कळणार? परिस्थितीशी झुंज देताना अनुभवातून आलेल्या शहाणपणातूनच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्वाला पूर्णत्व येईल.

खरं तर हा विषय नुसत्या चर्चेचा नसून कृतीचा आहे. असा प्रयत्न सर्वच पालकांकडून झाला तर मुलं संस्कारक्षम बनून त्यांचं वैयक्तिक आयुष्य तर सुधारेलच, त्याचबरोबर चांगल्या समाजाची घडण होईल व पर्यायाने राष्ट्रउभारणीसही हातभार लागेल.

चला तर मग, शेतकरी बनून या साऱ्या बीजाचं रोपण करू म्हणजे निश्चितच सुगीचे दिवस येतील व त्याचा आनंद पालक व पाल्यांना आयुष्यभर उपभोगायला मिळेल.

कोण जाणे, ह्यातलाच एखादा, देशाचा प्रथम नागरिकदेखील बनू शकेल, खरं ना?

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (८ मार्च २०१०) भगिनी समाज, सोलापूर यांनी आयोजीत केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसपात्र.

Saturday, November 7, 2009

सांगड

विश्वामध्ये सर्वात जिज्ञासू प्राणी जर कोण असेल तर तो मानव! त्याच्या जिज्ञासेतून विज्ञान जन्माला आले. 'विज्ञान' म्हणजे एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान! विज्ञान म्हणजे शोध, नूतनता! आजचं विज्ञान हे प्रगतीचं शिखर सर करतोय. दशावतारातील वामनानं जसं तीन पाउलात सारं त्रिभुवन व्यापलं, तसंच 'विज्ञान' या तीन अक्षरांनी सारं भौतिक विश्व व्यापून टाकलंय. आपल्या बुद्धीच्या बळावर माणसाने विज्ञानाची निर्मिती केली आणि आपल्या सुखासाठी त्याला यथेच्छ राबविले व राबावीत आहे. आज मात्र अशी स्थिती झालीय की, ज्या मानवाने विज्ञानाची निर्मिती केली तोच या विज्ञानाच्या हातातलं नकळतपणे एक बाहुलं बनलाय. त्याने निर्माण केलेल्या साधनांच्या उपभोगात तो मग्न झालाय. नुसता मग्नच नाही तर त्याच्या अधीन झालाय. अन जेथे अधीनता, परस्वाधीनता तेथे अस्थैर्य, अशांतता व बैचैनीचा उगम! आज माणसाच्या मनाला स्थैर्य राहिलं नसल्याचे चित्र आपल्यापुढे दिसतंय. विज्ञानाची ज्या वेगानं प्रगती होतेय त्याच वेगानं हिंसा, अनिती व अशांतता फोफावत असल्याचं आपण पाहतोय. अन हाच समाज व राष्ट्रहिताच्या काळजीचा व चिंतनाचा एक विषय बनतोय.

या साऱ्यांचं महत्त्वाचं कारण म्हणजे विज्ञान युगात धर्माचं अधिष्ठान किंवा धर्माचा अंकुश राहिलेला नाही. माणूस भरकटत चाललाय. मानवाच्या सफल आणि कल्याणकारी जीवनामध्ये धर्माचा वाटा फार मोठा आहे. तसं पाहता धर्माचा अर्थ एका वाक्यात नमूद करणं अगदी अवघड. पण सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर धर्म म्हणजे संस्कार, सदाचार, विवेक! ही सारी धर्माचीच अंगे आहेत. सदविवेक ही धर्माची परिणिती आहे. धर्मामुळे माणूस विवेकसंपन्न होऊन त्याद्वारे त्याच्याकडून सत्कार्य घडत असते. उदाहरण पाहायचं झालं तर शास्त्रज्ञांनी अणूचा शोध लावला. विज्ञान जगतातला फार मोठा व महत्त्वाचा शोध! या शोधामुळे Atomic Energy म्हणजेच अणू-विद्युतशक्ती प्रचंड प्रमाणात निर्माण होते व तिचा वापर औद्योगिक उत्पादन, शेती उत्पादन, रेल्वे, घरी लाइट व इतर विद्युत उपकरणांसाठी होत असलेला आपण पाहतोय व त्याचा उपभोगपण घेतोय.

पण याच अणूच्या संशोधनाने प्रचंड अशी विनाशकारक शक्तीसुद्धा निर्माण होते ज्याला आपण Atom bomb म्हणतो व जो मानवी संहारास कारणीभूत होऊ शकतो. जपानची हिरोशिमा-नागासाकी ही बॉम्बच्या साहाय्याने उध्वस्त झालेली शहरे आपल्यासमोरची जिवंत उदाहरणे आहेत. आजही अनेक देश याच भीतीखाली वावरताना दिसत आहेत.

या वरून आपण असं पाहतो की, विज्ञान निर्मितीचा प्रस्तुत उदाहरणाप्रमाणे दोन प्रकारे वापर होऊ शकतो. एक मानवसंहारक ऍटमबॉम्ब तर दुसरी मानवकल्याणकारक ऊर्जानिर्मीती. जर सदविवेकाची साथ असेल तर आपला कल ऊर्जा निर्मितीकडे म्हणजेच पर्यायाने मानव कल्याणाकडे जाईल पण या विज्ञाननिर्मितीला जर असंस्कृत, शोषणयुक्त अशा कुविचारांची साथ असेल तर मानव संहारक बॉम्बकडेच वळेल; प्रसंगी किंचितशा चुकीमुळे, अविवेकामुळे, इतरांबरोबर आपलाही घात होऊन आपली स्थिती सुवर्णप्रिय मिडास राजासारखी होईल.

मिडास नावाच्या राजाला सोनं फार आवडायचं. आपण जिथं हात लावू त्याचं सोनं व्हावं असं त्याला मनापासून वाटायचं. त्यासाठी तपश्चर्या करून त्यांनी देवाला प्रसन्न करून घेतलं. देव म्हणाला, "वत्सा, बोल तुला काय हवंय?" राजा म्हणाला,  "देवा, मी हात लावेल त्याचं सोनं व्हायला हवंय."  देव शांतपणे म्हणाला, "राजन्, पूर्णपणे विचार करून हा वर माग." राजा अधीर होऊन म्हणाला,  "देवा मी पूर्ण विचाराअंतीच हा वर मागतोय." राजाचा हट्ट पाहून देव 'तथास्तु' म्हणून अंतर्धान पावला. राजा आनंदाने बेभान होऊन ज्याला त्याला हात लावीत सुटला. हात लागेल ते सोन्याचं होत होतं. महालात जाऊन राजकन्येला हे सारं दाखवावं म्हणून हात धरला तर ती सोन्याचा पुतळा बनली. जेवणाच्यावेळी अन्नाचा घास उचलला त्याचे सोने झाले. जगणेच कठीण झाले. शेवटी पश्चातापदग्ध व लोभी राजाचा दुःखातच अंत झाला - ऐहिक उपभोगासाठी धडपड करताना व त्याचा आस्वाद घेताना संस्कार, विवेकाचं भान नसेल तर ते नाशाचे कारण होऊ शकेल व जीवन सुखमय होण्याऐवजी क्लेशकारकच होईल याची जाणीव आज माणसाला होणे आवश्यक आहे.

विज्ञान हे निश्चितच मानवाला सुख-समृद्धीकडे नेण्याचं साधन आहे, पण त्याचा उपयोग मात्र धर्म-संस्कार प्रणीत 'विवेकानं' करणं आवश्यक आहे. विज्ञान हे मानवाची ऐहिक प्रगती करतं तर धर्म मानसिक क्रांती घडवितं. थोडक्यात धर्माशिवाय ज्ञान म्हणजे मुठीवाचून तलवार, जी प्रसंगी आपलाच हात कापते तर विज्ञानावाचून धर्म म्हणजे पुढे तलवारीचं पातं नसलेली नुसती मूठ!  पात्याशिवाय लढणार कसे? मग अज्ञानाचं व अंधश्रद्धेचं खूळ फोफावू लागेल. यशस्वी जीवनाच्या रणांगणावर 'विज्ञान व धर्म' यापैकी एकाशिवाय दुसरं निरुपयोगीच ठरेल.

तेव्हा २१ व्या शतकाचे स्वागत करताना भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर व राष्ट्रपुरुष विवेकानंद यांना अभिप्रेत असलेली विश्वशांती व राष्ट्रउभारणी केवळ 'धर्म व विज्ञान' यांची सांगड घालूनच होऊ शकेल याची जाणीव ठेवून वाटचाल करणं हिताचं होईल, नव्हे ती आजची गरज आहे.

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

Tuesday, October 13, 2009

पाहुणचार

दिवाळी आली की हटकून मला ३-४ वर्षापूर्वीच्या माझ्या पहिल्या दिवाळसणाची आठवण होते. लग्नानंतरची पहिली दिवाळी सासुरवाडीला झाली. सगळेच नवीन - संबंध, माणसे, स्वभाव! अन त्यात आमचा स्वभाव भिडस्त! म्हणून तर ती दिवाळी चांगलीच लक्षात राहिली.

दसरा संपवून ८-१० दिवस झाले की, सासरेबुवा येऊन वत्सलेला माहेरी घेऊन गेले. मलाही आग्रहाचे निमंत्रण होतच. पहिल्या आंघोळीच्या दिवशी सकाळी मी तिथे गेलो. सासुरवाडी अगदीच खेड्यात होती. एस. टी. स्टँडवर उतरून पुढे वस्तीवर जावे लागे. स्टँडवर दोन्ही मेहुणे, सासरे व इतर दोघे तिघे जण होते. मी बॅग घेऊन चालायला लागलो. तोवर गडी पळत येऊन म्हणाला, "चला दाजी. रस्त्याच्या कडला गाडी हुभी केलीया!" मला बैलगाडीची सवय नसल्याने मी म्हणालो, "बैलगाडी कशाला? चालतच जाऊ की वस्तीवर." पण एवढ्यात सासरेबुवा म्हणाले, "नगं नगं आवं तुमच्यासाठीच तर गाडी जुपलीय अन चालत कशापाय?" मग दोन्ही लहान मेहुणे व मी गाडीत बसलो, इतर सारे आमच्या मागे गप्पा मारीत निघाले.

बैलं पळायला लागली तसे माझ्या शरीराला जोरजोरात हिसके बसायला लागले. एकदा डोकं दांड्यावर आपटलं तर एकदा मीच जोरात उठून परत गाडीत आदळलो. म्हटलं आता घरी जाईपर्यंत आपलं काही खरं नाही. माझे दोन्ही मेहुणे मात्र गाडीच्या दांड्यावर बसून मजा लुटत होते. मला नेमकं कसं बसावं हेच समजेना अन बहुतेक माझी ही अडचण सासऱ्यांच्या लक्षात आली असावी. ते म्हणाले, "आरं हणम्या, गाडी जरा दमानं हाक की लेका, शेरातल्या मानसास्नी सवं नस्ती गाडीचीऽऽऽ". पण इकडं हणमंतराव गाणं म्हणत आपल्याच नादात गाडी हाकीत होते. त्यामुळे आमचे हाल चालूच होते.

खरं तर खेड्यातलं शुद्ध वातावरण, सकाळचा पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार वनराई या साऱ्यांनी एरव्ही मन कसं प्रसन्न झालं असतं. पण इथं या गाडीच्या हिसक्यांनी अंग नुसतं बुकलून निघत होतं. एवढ्यात गाडी वस्तीसमोर थांबली. मी टणकन उडी मारली नि सुटकेचा श्वास सोडला. सासूबाईंनी भाकरीचा तुकडा ओवाळून स्वागत केले. दाराच्या आडून वाकून वत्सला मोठ्या कुतूहलाने व हसत माझ्याकडे पाहत होती. पुन्हा तशाप्रकारचं कुतुहुलमिश्रीत हसणं, निरागस भाव कधीच दिसले नाहीत. कदाचित सर्वांचा हाच अनुभव असावा... असो.

हात-पाय धुऊन झाल्यावर चहा-फराळ आला. सासरे म्हणाले, "घ्या, फराळ घ्या दाजी"

फराळाला सुरुवात केली. चावून चावून कानशील दुखून आली तर तिखटानं नाकाला धार लागली. त्यात पून: पुनः आग्रह! कानशिलावरून हात फिरवीत मी नको नको म्हणत होतो. एवढ्यात हणम्या तेलाची बाटली घेऊन आला व म्हणाला, "चला दाजी, अंग चोळतो. " हणम्या आपल्या सर्व ताकदीनिशी अंग चोळायला लागला. त्याच्या हिसक्यांनी मी कळवळून म्हणालो, "अरं हणमंता, जरा सावकाश रेऽऽ"

"थांबा उईसं दाजीऽ, परवासानं शिणला असचाल नव्हं? अंग मोकळंच करतो." तो नेमका माझं अंग मोकळं करीत होता की त्याच्या स्वतःच्या ताकदीचा अनुभव घेत होता हेच मला समजेना.

"पुरे पुरे, हणमंता! " असं म्हणत उठून उभा राहिलो. "बरं बरं, आता उटणं लावून आंगुळच घालतू म्हंजी कामच संपील" असं म्हणत त्यांनी मुलांना हाक मारली, "या रंऽ पोरावानोऽ", अन आंघोळीला सुरुवात केली. घंगाळीतून मोठ्या तांब्यांनी पाणी अंगावर ओतलं नि मी थोडाफार ओरडतच उठून उभा राहिलो.

"अरे, अरे, पाणी फारच कडक आहे कीऽ". पण माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत हणमंतानं मला दाबून खाली बसवत सपाटा लावला. मुलेही उटण्यानं अंग खसाखसा घासायला लागली. मग मात्र मला सोसवेना. मी तडक उठलो नि ओलेत्यानेच ओसरीवर येत अभ्यंगस्नानाची सांगता केली.

खरं तर दिवाळीचा सुमार म्हणजे थंडीची सुरुवात. पण असल्या थंडीत देखील दुपाऽऽऽरपर्यंत अंगाची व पाठीची आग आग होत होती. वैतागून मी वत्सलेला म्हणालो, "अगं काय हे घासणं? पाठ सकाळी सोलून निघाली असेल."

"तेल लावू का थोडंसं? मऊ पडेल. " ही हलक्या आवाजात म्हणाली. "छट, पाठीला हात लावायचं नाव काढू नकोस. आधीच सकाळी बैलगाडीत अंग तिंबून निघालंय यात आणखी ही भर!" वत्सलेला हे सारं पसंत नसावं. पण तशी ती अगदीच मऊ होती. कोणाला काही बोलली नाही. त्यांच्या सर्व कुटुंबात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली फक्त वत्सलाच. रोज तालुक्याच्या गावी जाऊन शिकली म्हणून तर सासऱ्यानं शहरातला जावई शोधला म्हणे.

दुपारच्या जेवणाला उशीरच झाला. गावातले चार-दोन लोक पंक्तीला होतेच. जेवण एकदम चमचमीत! अन आग्रह तर विचारता सोय नाही. दुपारी मस्तपैकी ताणून दिली.

दुपारचा चहा शेजारी अप्पांकडे झाला. अप्पांकडचा चहा फराळ म्हणजे सकाळच्या दात अन कानशील दुखीत दुपटीनं भर पडली. तिथून सासऱ्यांच्या शेतातून चक्कर मारली. बागायत शेती सगळी, फारच आल्हाददायक! पुढे लांबवर धुरांचे लोट, काही काही नव्हतं. सगळं कसं शुद्ध अन शांत शांत वाटत होतं. निसर्गातल्या आगळ्या वेगळ्या सानिध्यात मन कसं प्रसन्न झालं होतं. फिरून सारे वस्तीवर परतलो. सासूबाई पणत्या लावीत होत्या. दृश्य खरंच लोभसवाणं होतं. सगळ्या वस्तीवरच्या मुलांना घेऊन फटाके उडविले. मजा आली.

नको नको म्हणत पुन्हा रात्रीचे जेवण भरपूर झालंच. घरी अगदीच ठरावीक वेळी खायची सवय असल्याने रात्रभर अस्वस्थच होतो. पहाटे लवकर जाग आली म्हणून बाहेर आलो तर हणमंता अन मुलं आंघोळीच्या तयारीत असलेली दिसली. बाप रेऽ म्हणत पटकन पुन्हा खोलीत शिरलो व वत्सलेला ठामपणे सांगितले की आज परत कालाच्यासारखी आंघोळ घालाल तर मी तसाच गावी जाईन. मग हिच्या सांगण्यावरून आंघोळीचं संकट टळलं होतं, पण रात्रीपासूनची पोटदुखी चालूच होती. मी हिला सहजच म्हणालो, "अगं, रात्रीपासून पोट दुखतंय गं!"

झाऽऽलंऽ - बघता बघता ही बातमी साऱ्यांना समजली. लगेच अप्पा, आबा, मामा, पाटील सारेच गोळा झाले.

या साऱ्या लोकांच्या एकोप्याचं मला भारी कौतुक वाटलं अन लगेचच आमच्या चाळीतले दिवस आठवले. तिथही असच, जऽरा कुठं खुट्ट वाजलं की सारी चाळ गोळा व्हायची. मग सार्वजनिक विचार-विनिमय, सल्ला वगैरे वगैरे. पण हल्लीच्या फ्लॅटमध्ये पोट दुखू द्या नाहीतर कोणाचा जीव जाऊ द्या कुणाला त्याचं सोयर सुतक नसतं. साधं फिरकायला सुद्धा कोणाला सवड नसते. फ्लॅट सिस्टम मधली ही आधुनिक 'फ्लॅट' संस्कृती असावी कदाचित.

अप्पांच्या आवाजाने मी भानावर आलो. अप्पा पुढे सरसावत म्हणाले, "पोटदुखीवर लै जालीम औषध हाय माझ्यापाशी. हे बघा दाजीस्नी भरपूर जेवायला घालायचं अन पाण्यातून सोनामुखी घ्यायची. पोट नाही थांबलं तर इच्चारा मला. आवं काट्यांनी काटा काडायचा."

मग प्रत्येकजण आपापला औषधी बटवा मोकळा करू लागला. कुणी काय तर कुणी काय. आळीपाळीनं त्यातल्या दोन-तीन जिनसा माझ्या पोटात गेल्या अन आगीतून फोफाट्यात गेल्यासारखं झालं. दिवसभर हेलपाट्यानं बेजार झालो. माझ्यासोबत येणारा श्रीपतीसुद्धा हैराण झाला. शेवटी वत्सलेला विचारून परस्पर मी व श्रीपतीनी डॉक्टर गाठला व औषध घेऊन आलो. पण दुर्दैव माझं की घरी येईपर्यंत मंडळी वस्तीवर हजर होतीच. बहुदा आमची बातमी येण्यापूर्वीच पोचली असावी. कारण आम्हाला पाहताच अप्पा म्हणाले, "दाजी तिकडं कशाला गेला बरं? आवं डाकदर कसला, हजाम लेकाचा त्योऽ. आमी दिलं नसतं व्हय औषध? "  हे ऐकून मनात म्हटलं - कशाचं औषध अन काय? ऐन दिवाळीत पोटाचं दिवाळं निघालं. पण सावरीत म्हणालो, "तसं नव्हे अप्पा, जरा जास्तच त्रास व्हायला लागला म्हणून गेलो."

औषधाने बराच गुण आला. झोपही छान लागली. सकाळी उत्साह वाटत होता. रात्रीच्या गाडीनं परत गावी निघायचं होतं. सगळी तयारी करून ठेव असं वत्सलेला सांगितले. एवढ्यात पाटील आले व म्हणाले, "हं काय म्हनतीया जावईबापूंची तब्येत?"

"बरीय आता" मी म्हणालो.

"बगा बरं, आमच्या अप्पाचं औषध हायच तसलं."

मी गप्प बसलो. म्हटलं खुलासा करून परत नवीन संकट नको.

"आज आमच्यात जेवाया यायचं बरं का"

"नको, नको" मी घाईघाईनं म्हटलं, "अहो आत्ताच तर बरं वाटतंय त्यात आज गावाला पण जायचंय".

"मग त्येला काय होतंय? अवंऽ जान-जवान मर्द तुमी, अन असं भ्याया काय झालंय? काय व्हत नाही. वैनी, आज वच्छीला अन जावई बापूला पाठवा बरं जेवाया. त्यांच्यासाठी आज खास कोंबडं कापलया."

आता मात्र कहर झाला होता पाहुणचाराचा!

पण या साऱ्यांच्या आतिथ्याचं, पाहुणचाराचं मला भारी नवल वाटत होतं. प्रत्येकांच्या वागण्यात अगत्य, आग्रह, आपुलकी! कोणाला घरचा, शेजारचा वगैरे फरकच जाणवत नव्हता. सगळं कसं एकदिलानं चाललं होतं. त्यात थोडासा अतिरेकी पणा होता हे खरंय, पण ते सारं शुद्ध मायेपोटीच नव्हतं का? आपल्याकडे कुणीतरी यावं, पोटभर खावं! हीच भावना.

खरं तर ही भावना सुद्धा हल्ली कमी होत चालली आहे. भावनाच कमी होतेय तर मग स्वतः कष्ट करून जेवू-खाऊ घालणं तर लांबच. उलट एखाद्याकडे गेलो व दुर्दैवाने तिथे जर टी. व्ही. वर एखादी मालिका अथवा मॅच चालू असेल तर, भेटायला गेलेल्या माणसाचं सुद्धा "कशाला नसती ब्याद आली?" अशा चेहऱ्याने स्वागत होते. त्यामुळे असल्या पाहुणचाराचं माझ्यासारख्या शहरी माणसाला जरा जास्तच अप्रूप वाटलं आणि ही सारी जमेची बाजू गृहीत धरून मी पाटलांच्या जेवणाला शेवटी होकार दिला.

नेहमीसारखाच त्यांच्या आग्रहाला व कोंबडीच्या रस्स्याच्या मोहाला बळी पडून भरपेट जेवलो. पोट अगदी तडीस लागलं होतं. इथंही आमचा भिडस्त स्वभाव नडलाच.

निघायची वेळ झाली. सारी मंडळी एकत्र जमली. हुरड्याला, गुऱ्हाळाला यायचं आमंत्रण स्वीकारून साऱ्यांचा निरोप घेतला. एस. टी. मार्गाला लागली. वत्सला माझ्या खांद्यावर डोकं ठेवीन निर्धास्तपणे झोपली होती. गाडीच्या हिसक्यांनी पुन्हा माझ्या पोटात गडगडल्यासारखं वाटत होतं. त्यामुळं मी मात्र धास्तावून परमेश्वराचा धावा करत होतो, "देवा रे, घर गाठेपर्यंत आतून कोंबड्यानं बांग दिली नाही म्हणजे जिंकली रेऽ बाबाऽऽऽ"

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

Saturday, September 19, 2009

सत्ता

निवडणुका व त्याच्या तारखा जाहीर झाल्या. वाटलं चला मतदानाच्या निमित्तानं सुट्टी मिळेल. तेवढाच आराम. पण हा माझा आनंद काही फार काळ टिकला नाही.

घरी गेलो तर तिथे निळूभाऊ व गजाभाऊ बसलेले दिसले. मला पाहताच ठेक्यात म्हणाले "याऽ याऽ आण्णासाहेब! तुमचीच वाट पाहत होतो."

मी म्हटलं, "का बुवा? आज या गरीबाची वाट?"

"अहो निवडणुका जाहीर झाल्यात. आम्ही उमेदवार शोधत होतो. निळूभाऊंनी तुमचं नाव सुचवलं. मग आलो इकडं." गजाभाऊ म्हणाले.

"छे हो, आम्ही मास्तर, आम्ही कसले होतोय उमेदवार!"

"आहो, हाय काय त्या नोकरीत? द्या की लाथाडून! उद्या निवडून आलात तर असले पाच-पंचवीस मास्तर येतील की तुमच्या हाताखाली!" - निळूभाऊ.

"नको नको! मला तुमची उमेदवारी पण नकोय अन् हाताखालची माणसंही." मी जरा तोडूनच बोललो. तरीही दोघे गळ घालायला लागले, पण शेवटी मी ठाम आहे हे पाहून निळूभाऊ म्हणाले, "अण्णांच्याऐवजी वैनीन्ला हुबं केलं तर?"

"हांऽ! अगदी बरोब्बर बोललात बघा निळूभाऊ!" गजाभाऊ बोलले. "म्हंजे कसं?, त्या विमलीला शह दिल्यासारखं हुईल, लई तोरा हाय तिजा!"

मग दोघेही हिच्या पाठीमागे लागले. एवढा वेळ गप्प असलेली आमची ही म्हणाली, "भावजी, मला काय कळतं त्या राजकारणातलं? मला नकोय ते झंझट!"

"अहो वैनी, तुमी नुस्तं व्हय म्हना. बाकीचं सगऽळं आम्ही बगून घिऊ. प्रचार, निधी, कचेरीत जायचं, चिन्नं आनायचं, काय म्हनून काय तुम्माला बगावं लागाचं न्हाय, फकस्त तुम्ही व्हय म्हना."

"अरे काय व्हय म्हणा? कुणी मत तरी द्यायला नको का? विनाकारण डिपॉझिट जप्त व्हायचं" मी म्हणालो.

तसं लगेचच निळूभाऊ बोलले, "अहो हितं कुनाला जग जिंकायचंय? आपल्याला निस्ती त्या विमलीची मतं फोडायचीत."

"मग तुम्हीच उभे राहा ना", मी कंटाळून म्हणालो.

"गेल्या बारीनं हुबाच व्हतो, पन आपटलो ना! म्हून तर या बारीनं दुसरा उमीदवार हुडकतुया. वैनी, एकदाच हुबं ऱ्हावा, पुन्ना कंदी आग्रं धरावचो नाय..."

होय, नाही करीत शेवटी एकदाचा कचेरीत जाऊन हिचा अर्ज भरला गेला. हां हां म्हणता सगळीकडे बातमी पसरली. शाळेमध्ये तर माझा भाव एकदमच वधारला. जो तो "हं, काय पाटील, बायकोला पुढं करून तुम्ही राजकारणात शिरलात म्हणे? आता काय बुवा आम्हाला विसरणार?" असे म्हणू लागला.

"अहो, कसलं विसरणं आलंय? हिच्या उभं राहण्यानं टेन्शन मात्र आलंय" असे माझे त्याला उत्तर असे.

निळूभाऊ व गजाभाऊ ही जोडी तशी बिलंदर! संधीसाधू! आणी हिला तसा काही आचपेच कळत नव्हता. त्यामुळे मला जागरूक राहणं भाग होतं. अर्ज भरल्यापासून दोघांच्याही आमच्या घरच्या चकरा वाढल्या होत्या. वेगवेगळी मंडळं दाखल होत होती. अर्ज भरल्यानंतर आठवड्याभरातच दोघे आले. दोघांत नेहमी निळूभाऊंचा पुढाकार असे. म्हणाले, "वैनी, आता लौकरच प्रचाराचा नारळ फोडला पाहिजे बरं का? म्हंजे झ्याईरातीसाठी निधी गोळा करता ईल. आदी देवीला नारळ फोडू अन् सगळे मिळून निदी गोळा कराया जाऊ."

खरं तर हिच्या पक्षाच्या प्रचारापेक्षा दोघांनाही निधीतच जास्त इंटरेस्ट होता हे मी जाणत होतो. पण आता ते म्हणतील त्याला हो म्हणणं भाग होतं. त्यात निळूभाऊ स्वतः याआधीची निवडणूक लढल्यामुळे (की पडल्यामुळे?) राजनीतीचे डावपेच त्यांना चांगलेच माहीत होते.

विमलताई (निळूभाऊंची इमली) गेल्या निवडणुकीत निळूभाऊंवर मात करून प्रचंड मताने निवडून आल्या होत्या. म्हणून तर यावेळी त्यांना विमलीवर विजय मिळवायचा होता. एकेदिवशी सकाळीच निळूभाऊ आले अन् म्हणाले, "वैनी, जरा कुक्कू आना बरं आतनं, चिन्न आनलंय्". हिनं हौसेनं करंडा आणला. निळूभाऊंनी घडीचा कागद हलकेच उघडला, तो पाहून ही ओरडली, "हे काय? वस्तरा?"

"अहो, त्या विमलीचं चिन्न तेलाची बाटली हाय, म्हून मुद्दाम हे चिन्न निवडलंय. आता ह्या वस्तऱ्यांनीच इरुद्ध पार्टीची हजामत करू. मग लावा म्हनावं टाळूला तेल कसं लावत्यात ते."

त्या विमलताईंच्या ईर्ष्येने का होईना निळूभाऊ हिच्याकडे जास्त लक्ष देत होते एवढं खरं.

"हं वैनी, करा सुरुवात", "चांदीच्या तबकात केशरी बुक्का, अन् वस्तऱ्यावर मारा फुलीचा शिक्का."

प्रचाराला वेग आला. हिनं हिच्या मंडळातल्या, शेजारच्या अशा १०-१५ महिलांचा गट तयार केला. शिवाय ती जोडगोळी हिच्याबरोबर होतीच. निळूभाऊंचे उपद्व्याप चालूच होते. त्यांनी कुठल्या तरी सिनेमाचा वयस्क हिरो आणून, हिच्यासमवेत त्यांचा फोटो काढून पेपरला दिला व बातमी दिली की, सुप्रसिद्ध सिनेनट सौ. कमलताई पाटलांच्या पक्षात सामील! त्यांच्याबरोबर एक सभा पण घेतली. हिला म्हणाले, "वैनी, आजच्या सभेत दुसऱ्या पक्षाला शिव्या हासडायच्या बरं का?"

"म्हणजे?" ही म्हणाली.

"अहो भाषण तेच. निस्तं पक्षाचं नाव बदललं म्हंजे झालं!"

त्या एका महिन्याच्या अवधीत हिला कित्ती अनुभव आले असतील? बरंच झालं. जरा बाहेरच्या दुनियेची तोंडओळख तरी झाली त्या निमित्तानं!

एका रविवारी शेजारच्या खेड्यात हिनं प्रचारसभेचं आयोजन केलं. मला म्हणाली, "आज तुम्ही यायचं हं." सभा दुपारी चारला होती. आम्ही वेळेतच गेलो. पण सगळा शुकशुकाट होता. "हे काय? सभा असल्याचं जाहीर केलंय ना?" मी म्हणालो.

"हे तर नेहमीचंच आहे. थोडं थांबा. भावजी सगळं व्यवस्थित करतील."

निळूभाऊ, गजाभाऊ गावात गेले अन् बघता बघता ५-२५ माणसं लगेचच गोळा झाली. हळूहळू गर्दी वाढू लागली. निळूभाऊंनी थोडी प्रस्तावना केली व हिला म्हणाले, "वैनी, चला सुरू करा!"

हिनं भाषणाला सुरुवात केली. "मतदार बंधू-भगिनींनो, मागच्या नेत्यानं या पाच वर्षात काय दिवे लावले आहेत हे तुम्ही जाणताच. तेव्हा आता जास्त काही भाषणबाजी न करता मी आश्वासन देते की, गावच्या विकासासाठी गावात पाणी, शेतीपंपासाठी वीज व वाहतुकीसाठी पक्क्या सडका करून देऊ. मी अभिवचन देते की ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी परवा कारगिलमध्ये आपले शूर जवान ज्या शर्थीनं लढले त्याच शर्थीनं आम्ही ही निवडणूक लढवून तुमचा विकास करू. त्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर!"

अरे, रे रे, हिच्या या अफाट वक्तृत्वाने मी मात्र खजील होऊन मान खाली घालून बसलो. कशाचा संबंध कशाला लावीत होती! कारगिल, अभिवचन, प्राणाची बाजी, असले शब्द वापरल्याने आपलं भाषण भारदस्त वाटेल असं ही समजत होती की काय? तेवढ्यात लाईट गेली. मी सुटकेचा श्वास सोडला. नाहीतर आणखी कितीवेळ असली असंबंध भाषणबाजी ऐकावी लागली असती कोणास ठाऊक!

माईक बंद पडल्यामुळे हिचे फक्त हातवारे व तोंडाची हालचाल दिसायला लागली. लोकांची चाललेली चुळबूळ पाहून मी हिला खुणावलं, आटपतं घे. पण लगेच निळूभाऊ म्हणाले, "वैनी लाईट आत्ता ईल, तुमी बोलत ऱ्हावा."

लाईट आलीच नाही, पण एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेऊन, पुढला अनर्थ टाळण्यासाठी आम्ही घर गाठलं.

घरी आल्यावर मी हिला चिडून म्हणालो, "बंद करा आता हा प्रचार! उगाच काही देणं न घेणं. निष्कारण डोक्याला ताप!"

ही म्हणाली, "झालं, दोन-तीन दिवसात प्रचार बंदच होईल. मग निवांतच आहे."

प्रचार बंद झाला. सगळं कसं शांत शांत वाटायला लागलं. आवाजांनी डोकं नुसतं भणाणून गेलं होतं. मतदानाच्या आदल्या दिवशी ही जोडगोळी आली व "वैनी चला बरं जरासं आमच्याबरोबर" असं म्हणून हिला बरोबर नेलं. जाताना माझ्याकडून थोडेसे पैसे सुद्धा नेले. हिचा प्रचार सुरू झाल्यापासून माझ्याच खिशाला कितीतरी झळ बसली होती.

नेमकं कोणाला काय हवं असतं ते निळूभाऊंना माहीत असल्यामुळे ज्याला-त्याला जे-ते देऊन मंडळी उशीराने घरी परतली. मतदान शांततेत पार पडलं. मी सुटकेचा श्वास सोडला.

मतमोजणी सुरू झाली. मी हिला म्हणालो, "अगं, निळूभाऊ, गजाभाऊ कसे आले नाहीत?"

"अहो, मी पण त्यांचीच वाट पाहतेय." ही अस्वस्थ होत म्हणाली.

त्यादिवशी दुपारपर्यंत निकाल जाहीर झाले. फटाक्यांची आतषबाजी झाली अन् आवाज आला, "कमलताई पाटलांचा विजय असो."

"अऽरे" मी आश्चर्याने अवाकच् झालो.

काही का असेना, पण हिच्या विजयाचं श्रेय निळूभाऊ व गजाभाऊंनाच जात होतं. गुलाल, हार-तुऱ्यात हिची मिरवणूक काढण्यात आली. दोघेही थाटात अंगरक्षकाप्रमाणे हिच्या शेजारी उभे होते.

रात्री मी हिला म्हणालो, "अगं आता दोघेही तुझे पी. ए. होतील हं; आता तर फार सांभाळून राहावं लागेल, नाहीतर हे दोघे काय करतील याचा भरवसा नाही."

तशी ही जराश्या थाटातच म्हणाली, "अहो कांऽही काळजी करू नका. इतके दिवस वस्तरा त्यांच्या हातात होता, पण आता तो माझ्या हातात आलाय. विनाकारण मध्ये-मध्ये डोकं खुपसायला लागले तर त्या वस्तऱ्यांनीच दोघाची पण ... करेन."

"व्वा, शेरास सव्वा शेर!" मी म्हणालो.

पण लगेच तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली, "तेच काय, कुणीही मध्ये नाक खुपसलं तर त्यांची हीच गत होईल."

अरे बापरेऽ! आजच सत्ता हातात आलीय तर हा रुबाब? सत्तेत एवढं सामर्थ्य!

ही निवडणूक माझ्या सुद्धा अंगलट येणार की काऽय?

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

Tuesday, August 18, 2009

संक्रमण

रविवारी सकाळी चहा घेत पेपर वाचत बसलो होतो. ही म्हणाली अहो, आज  आमच्या मंडळाची मीटिंग आहे बरं का! कॉलनीतल्या सगळ्या महिलांसाठी एक महिला मंडळ स्थापलेलं होतं. मंडळ कसलं याचं? गोंधळ नुसता! काही सामाजिक काम नाही की विधायक कार्य नाही. नुसत्या फालतू गप्पा, एकमेकांची उणी-दुणी किंवा पोकळ स्पर्धांचं आयोजन! स्पर्धांना तरी ऊत आला होता. स्पर्धा कसली? तर म्हणे, चपलांचा ढीग करायचा त्यातून नवऱ्याने बायकोच्या व बायकोने नवऱ्याचा चपलांची जोडी शोधून, जो पहिला पोचेल त्याला पहिले बक्षीस! काहीतरी निरर्थक.

एकदा शेजारचा सारोळकर आला व म्हणाला, "पेढे दे. " "कसले? " "अरे वहिनींना स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालंय. "

"अस्सं? कोणत्या? " मी आश्चर्याने विचारलं.

तो म्हणाला, 'वाद-विवादाच्या'.

हे ऐकून मात्र मनातून मी खजील झालो. या ऐवजी वक्तृत्वाच्या असत्या तर नक्कीच पेढे वाटले असते. पण हसत हसत म्हटलं, अरे खरं तर हे बक्षीस तिला फार पूर्वीच मिळायला हवं होतं. आमच्या घरात देखील तीच याचं बक्षीस पटकावते. काही का असेना, या स्पर्धेपासून ती मंडळाची सेक्रेटरी झाली होती एवढं खरं.

मी काही बोलत नाही हे पाहून ती म्हणाली, 'अहो ऐकलंत ना? '

'हे आता कोणत्या स्पर्धा ठेवणार? ' मी वाचत म्हणालो.

अय्या, तुम्ही कसे ओळखलंत?

तुमचं मंडळ दुसरं काय करतं?

नाही हं माझ्या हातात बॅट आहे तोवर मी चौफेर फटकेबाजी करणार आहे.

म्हणजे? मी म्हणालो.

अहो, मी सेक्रेटरी असे पर्यंत हो.

अगं पण प्रत्येक वेळा पाककलेच्या स्पर्धाच कशाला? कधी तरी मुलांसाठीही काहीतरी ठेवावं म्हणजे कथा-कथन, सामान्य ज्ञान, पाठांतर, राम-रक्षा, गीतेचे अध्याय, अशांनी बुद्धीला जरा चालना तरी मिळेल किंवा ज्या महिला खाण्याचा एखादा पदार्थ चांगला बनवितात तो मोठ्या प्रमाणावर करून अनाथाश्रम, अंधशाळांना वगैरे जाऊन अन्नदान करा. सत्कार्य तरी होईल.

जाऊ द्या हो. तसलं कटकटीचं काही नको बाई. मेल्या शिष्ट आहेत सगळ्या. कधी असला एखादा प्रस्ताव मांडलं की हात झटकून मोकळ्या होतात. पण पाककला स्पर्धा म्हणताच मधमाश्या सारख्या गोळा होतात.

हिच्या समोर काही बोलण्यात तसा अर्थच नव्हता. बरं मग. कोणते पदार्थ ठेवणार?

हे बघा रव्याचा गोड पदार्थ व तांदळाचा तिखट पदार्थ. चला ठरलं तर मग. आज जाहीर करते. हिचा हुरूप पाहून मी म्हटलं, असले उद्योग केल्यापेक्षा सुट्टीत मुलांचा अभ्यास घे जरा.

ते अभ्यासाचं तुम्हीच बघा बुवा. ती कार्टी काही माझं ऐकत नाहीत. एवढं म्हणून बाईसाहेब मोकळ्या झाल्या.

स्पर्धेचा दिवस ठरला, सगळा स्त्री वर्ग कामात गर्क झाला. मुले पिशव्या घेऊन बाजारात पळू लागली. प्रत्येकाच्या घरातून तेलकट, तुपकट, खमंग असा वास येऊ लागला. रव्याचे लाडू नि तांदळाची चकली असे हिचे पदार्थ ठरले. घरात रोज एक नमुना होऊ लागला. एक दिवस हिने डिश मध्ये सुरेख सजवून लाडू आणले. मी म्हटलं, अरे वा! सजावट तरी छान झालीय. आता चव बघू म्हणून लाडू खायला लागलो पण काही केल्या तो फुटेना. हे काय गं?

थांबा हं मी फोडते.

पण हिचाही जोर अपुरा पडला. मुले दातांनी चावून खायचा प्रयत्न करू लागली. शेवटी मंगेशनं जमिनीवर आपटून फोडला व साऱ्यांना खायला दिला. असले कडक लाडू तू स्पर्धेला ठेवणार? अगं हा लाडू इथून एखाद्याच्या अंगावर नेम धरून मारला ना तर तो जखमी होईल, पण तुझा लाडू तसाच राहील. माझ्या या वक्तव्यावर मुले खो खो हसू लागली. हिनं चिडून धाकट्याच्या पाठीत धपाटा घातला. त्याने भोकाड पसरलं. ही हिरमुसली. मी जरा समजावण्याच्या स्वरात म्हटलं, अगं चव चांगली आहे. फक्त जरा मऊ होतात का ते बघ. चकलीचं असं होऊ देऊ नकोस. हिने मान डोलावली.

स्पर्धेच्या दिवशी दुपारी दोनलाच मी घरातून पळ काढला व दुपारच्या पिक्चरला जाऊन बसलो. म्हटलं नसती कटकट नको. संध्याकाळी सहा-साडेसहाला आलो तेव्हा आमच्या कॉलनीतल्या कॉमन हॉल मधून जोरजोराचा आवाज येत होता. अरे , स्पर्धा सोडून हा कसला आवाज? म्हणून मी आत डोकावला तर हिचा व साठे वहिनींचा कडाडून वाद चालला होता. मी मंगेशला म्हटलं अरे काय झालं? बाबा, अहो बक्षिसाच्या  क्षुल्लक कारणावरून दोन गटांत जो वाद चाललाय तो केव्हाचा. कुणीच कोणाचं ऐकत नाही. दूरून श्रीमान साठे माझ्याकडे पाहत होते. अतिशय सज्जन गृहस्थ ! यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मी ठरविलं.

एकंदरीत वातावरण पाहिलं व मंगेशला म्हणालो, मंग्या अरे जोरात शिट्टी वाजव बरं. पडत्या फळाची आज्ञा! मंग्याने ती इतक्या जोरात वाजविली की त्या भांडणाऱ्या दोघींसह सगळ्यांनीच त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं. साऱ्यांचं स्पर्धेचं वेड लक्षात होतंच. मी म्हणालो, हे बघा मंडळी, सध्या जे काही चाललंय त्याला आपण या वादविवादाच्या स्पर्धाच आहेत असं जर समजलं तर त्याचं पहिलं बक्षीस कोणाला द्यावं असं तुम्हाला वाटतं? माझी ही कल्पना पाहून साठेंनी माझ्याकडे पाहत डोळे मिचकावले. मीही त्यांना प्रतिसाद दिला.

' स्पर्धा ' हा शब्द ऐकताच वातावरणाचा सारा नूरच पुन्हा बदलला. सारे एकदम शांत होऊन हलक्या आवाजात आपापसात कुजबुजे लागले. सध्याचे युग हे स्पर्धेचे अन त्यानिमित्ताने मिळणाऱ्या बक्षिसाचे आहे हे मला ठाऊक होते पण त्या स्पर्धांनी लोकांना इतकं वेडंपिसं बनवलं असेल याची मलाही कल्पना नव्हती. बहुधा माझा घाव अचूक लागला असावा. आता साहजिकच दोन्ही गटांतून विरुद्ध पार्टीची नावे येऊ लागली. पेच निर्माण झाला. नेमकं कोणाचं नाव जाहीर करावं कळेना. म्हटलं आता पुन्हा वाद सुरू होणार. एवढ्यात साठे हसत म्हणाले, 'शेळके, पहिलं बक्षीस दोघांनाही विभागून दिलं तर योग्यच होईल ना?' आणि ही कल्पना मात्र साऱ्यांनीच उचलून धरली. सगळीकडे हास्य -कल्लोळ पसरला. हिप हिप हुर्ये! मुलं दंगा करू लागली. साठेंनी अप्रत्यक्षपणे दोघींचीही उडविलेली खिल्ली घालून लगेचच त्यांनी घर गाठलं.

दुसऱ्या दिवशी हलक्या आवाजात ही मला म्हणाली, अहो, काल जे काही झालं ते व्हायला नको होतं ना? मी रात्रभर विचार केला. तुमचंच म्हणणं पटलं बघा आता. उगाच असल्या स्पर्धा घेऊन त्यात वेळ व शक्ती वाया घालवून, एकमेकींची मनं कलुषित केल्यापेक्षा स्पर्धेच्याऐवजी सर्वांनी मिळून सण-वार प्रसंग पाहून खाद्यपदार्थ बनवून एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा अंधशाळेला भेट देणं, अशिक्षितांना साक्षर करणं, संस्कार वर्ग यात रस घेणंच योग्य होईल. मग तर तुमची मदत होईल ना?     

मी स्वप्नात तर नाही ना म्हणून स्वतःलाच चिमटा काढून पाहिला व भानावर येऊन म्हणालो, खूप आनंद झाला बघ तुझे विचार ऐकून. अगं अशी जर कामं तुमचं मंडळ करेल तर कॉलनीतल्या साऱ्या पुरुषवर्गाचा पाठिंबा तुम्हाला मिळवून देईन याची खात्री बाळग. एक स्त्री, एका कुटुंबास जर नावारूपाला आणते तर अनेक स्त्रिया मिळून किती विधायक कार्य करू शकाल?

हो ना? ठरलं तर मग. मी आजच मीटिंग बोलावते असं म्हणत ही आत निघून गेली.

एका रात्रीत अफलातून वैचारिक संक्रमण झालेल्या माझ्या पत्नीकडे मी 'आ' वासून पाहू लागलो. कधी एकदा साहेबांना हे सगळं सांगेन असं झालं होतं. विभागून दिलेल्या बक्षिसाचे दुसरे दावेदार, म्हणजे त्यांच्या पत्नीचेही असेच मन-परिवर्तन झाले की काय? हे जाणून घेण्याची आतुरता लागली होती.

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

Thursday, August 13, 2009

घर! कुणाचं!

      होम, स्वीट होम ही कविता मी अगदी समरस होऊन शिकवीत होते. सारा वर्गसुद्धा तितक्याच तन्मयतेने ऐकत होता, अन् तास संपल्याची घंटा झाली. सारेचजण कल्पनेतून जागे झाले. मी बाहेर पडले. आज प्रकृती बरी नसल्याने पुढचे तास न घेताच मी घरी जायचं ठरवलं व निघालेही.

      निघाले खरी पण कवितेतील घराबद्दलच्या कवीच्या कल्पना मात्र माझ्या मनातून जात नव्हत्या. घर! सृष्टीतील प्रत्येक जीवाचं आपल्या जीवा इतकंच प्रेम असतं ते स्थान! सर्वांना हवाहवासा वाटतो तो निवारा! अगदी जीवापासून  शिवापर्यंत निगडित असलेल्या घराबद्दल आपलं मन जर विचार न करील तरच नवल!

पाउले घराच्या ओढीनं स्पर्धा करीत होती तर मन कवितेच्या संदर्भाने अभिप्रेत असलेल्या घराच्या रम्य अशा कल्पनेची आणि मी प्रत्यक्ष अनुभवत असलेल्या माझ्या घराची तुलना करीत होते. डोळ्यासमोर आतापर्यंतचा तेरा-चौदा वर्षाचा गतकाल सरकत होता.

  पाच - सहा माणसांचं आमचं कुटुंब! आम्ही दोघे म्हणजे, मी व शेखर, आमची दोन मुलं. सासू - सासरे आणि दीर. पैकी मी व शेखर घरातले कमावते. खरं तर प्रत्येक बाबतीत मी शेखरच्या बरोबरीने कष्ट करीत होते पण का कोण जाणे या घरात माझी मलाच कुठेतरी उणीव भासायची, कमीपणा जाणवायचा. समाधान वाटत नव्हतं. घरातील इतर सर्व कामं सांभाळून नोकरी करायची शिवाय नवऱ्याची मर्जी सांभाळायची. एवढं सारं करून देखील मनाला असं वाटायचं की घरात वर्चस्व मात्र शेखरचंच! ते म्हणतील तिच पूर्वदिशा. यामुळेच  हे रितेपण जाणवत होते की काय कोण जाणे. मग मनात वादळ उठे की का? कशासाठी एवढा आटापिटा? कोणासाठी एवढी झीज? ह्या लोकांसाठी की घरासाठी? घर? कोणाचं? याचं की माझं?

मध्यंतरी दिराचं लग्न झालं. मर -मर कष्ट केले नावं आणि कौतुक मात्र शेखरचंच! लग्नानंतर हे नवीन जोडपं त्यांच्या नोकरीच्या गावी गेलं अन पुढं काही दिवसातच सासूबाईंनी अंथरूण धरलं. संपूर्ण दिवस सगळी कामं उरकेपर्यंत अगदी नाके नऊ यायचं. पण इलाज नव्हता. पुढे महिन्याभरातच त्या गेल्या. सर्वांना सोडून.

     आता घरची सगळीच जबाबदारी माझ्यावर आली. पुढे दीड - दोन वर्षातच सासरेपण गेले. घर अगदीच रिकामं झालं. आता आम्ही चौघेच. दिनक्रमात बदल नव्हता. प्रत्यक्ष व्यावहारिक किंवा कौटुंबिक बाबतीत मात्र माझ्या अस्तित्वाची जाणीव कोणालाच नसे. त्यामुळेच मनात खोलवर कुठेतरी वेदना सलत असावी. असं का व्हावं? कुठे कमी पडते मी? माझ्याच घरात परकेपणाची भावना का रुजावी? व अशा विचारांनी मनाला अस्वस्थ का करावं हेच कळत नव्हतं. पुरूषप्रधान असलेल्या या संस्कृतीत सर्वच मध्यमवर्गीय स्त्रियांची माझ्यासारखीच अशी मानसिक घालमेल होत असावी का? आणि असेलच तर आजच्या कवितेतील रम्य कल्पना व अनुभव यांचा वास्तविक मेळ नसावाच का?

विचारांच्या ओघात घर जवळ आलेलं कळलंच नाही. नाजूक प्रकृती व मनाला अस्वस्थ करणाऱ्या विचारांनी डोकं ठणकत होतं. दुसरे दिवशी अंगात ताप पण भरला. घरगुती औषधाने अंगात ताप तसाच मुरलेला असावा. उतरायची चिन्हे दिसेनात. मग साऱ्या तपासण्या केल्या. निदान येईपर्यंत तापाची सुरुवात होऊन चार दिवस झाले होते. कमालीचा अशक्तपणा आला होता. शेखरच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. काय झाले कोण जाणे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने मला लगेच दवाखान्यात ऍडमिट केलं. आता सगळी जबाबदारी शेखरवर येऊन पडली. त्यांची खूप तारांबळ होऊ लागली. घरचं, मुलांचं, दवाखान्यात माझ्याकडे येऊन बसणं, सगळं सगळं त्यांनाच पाहावे लागे. सुरुवातीला पंधरा दिवसांची रजाच घेतली होती. मला पूर्ण विश्रांतीच होती. शेखर माझी फार काळजी घेत. सगळं वेळेवर व स्वतः करीत, जागरण, दगदग व काळजीने त्यांचा चेहरा ओढल्यासारखा झाला होता. रोज रात्री दवाखान्यात झोपावं लागे त्यामुळे झोपही नीट होत नसे. एरव्ही जागरणाने चिडणारे शेखर आता मात्र शांत होते. आजारपणात त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू मला नव्याने पाहावयास मिळत होते.

हळू हळू माझी प्रकृती सुधारू लागली. कालचाच प्रसंग. मी त्यांना म्हटलं, "अहो, किती थकलात? थोडीशी विश्रांती घ्या. आता मी बरी आहे. माझी काळजी नका करू. " तसे ते हसत म्हणाले, 'अगं मी तर माझीच काळजी घेतोय. हे बघ, स्त्री म्हणजे घराचा आधार! संसारातला पुरुषाइतकाच महत्त्वाचा घटक! जमिनीत खोलवर रुजलेलं घट्टं मूळ! अगं झाडाचं मूळ सशक्त असलं म्हणजेच ते बाहेरच्या वादळवाऱ्याशी हिमतीनं झुंज देत राहतं. तेव्हा तू लवकर बरी हो बरं. आपल्या घराचा पायाच नाही का तू? तो पाया अदृश्य असला तरी संसाराची इमारत त्यावरच उभी नाही का? आणि आतापर्यंत या आपल्या घरासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव का नाही मला? त्यासमोर माझे हे कष्ट काहीच नाहीत. तेव्हा आता कसलाही विचार न करता तू स्वस्थ झोप पाहू. घरी जाण्याची परवानगी लवकरच मिळेल. '

काल शेखरने झोपायला सांगितले खरं पण माझी झोप मात्र पार उडून गेली. त्यांच्या आचरणातील सुप्त ओलावा मला स्पष्टपणे जाणवू लागला. कदाचित पुरूषप्रधान संस्कृतीतल्या 'पुरुषी' स्वभावामुळेच त्यांनी कधी आपल्या भावना व्यक्त केल्या नसाव्यात का? 

खरंच! या दिशेने मी कधी विचारच केला नाही. गुरफटलेल्या संसारात मला जमेल तितकं केलं, जमत नव्हतं तिथे तडजोड केली खरी, पण तडजोडीच्या सामंजस्याच्या जोडीला शेखरचा मूक प्रतिसाद होता म्हणूनच संसाराची इमारत उभी राहू शकली ना? माझ्या संकुचित स्वभावामुळेच मी माझ्या अस्तित्वाबाबतची चुकीची कल्पना करीत असल्याची मला जाणीव झाली. माझ्या मनातले विकल्प पार धुऊन निघाले. मन हलकं हलकं झालं अन् कधी झोप लागली कळलं देखील नाही. पुढे दोन दिवसातच घरी आले. पाहते तो...

दारावर हिरव्यागार पानांचं तोरण बांधलेलं होतं. दोन्ही मुलांच्या हातात 'सुस्वागतम्' व 'Welcome Home' अशा अक्षरांचा कागद होता. सारेच जण समाधानाने व आनंदाने हसत होते. माझं ऊर भरून आला. डोळे भरून वाहू लागले. शेखरच्या आधाराने मी घरात प्रवेश केला. सगळ्या घरावरून नजर फिरवली तर घरातील प्रत्येक वस्तू माझ्याकडे प्रेमाने, आपुलकीने पाहते असाच भास झाला. छे, इतके दिवस उगाच 'त्यांचं - माझं' असा खुळा विचार मी करायची. शेखरच माझे म्हणजे त्यांचं ते माझंच नव्हतं काय? द्वैतातून अद्वैत असं काहीसं म्हणतात ते याहून काय निराळं असावं?

बस्स! आता असले संकुचित विचारच बंद. आता लवकर बरं व्हायचं. पुन्हा नव्या उभारीनं संसाराला लागायचं. वर्गामधली "Home Sweet Home" ही कविता पूर्ण करायची, पण वेगळ्या अर्थानं! कारण त्या कवितेतील मधाळपणा आता मी माझ्या घरात चाखला होता त्यामुळे मन म्हणत होतं की अगं वेडे, घर कोणचं? हा प्रश्न मनामध्ये का आणतेस? घर तर दोघांचं!

विचारांची दिशाच आपल्या जीवनाचा चेहरा-मोहरा पार बदलून टाकतात. यावर विश्वास ठेवून त्यास प्रतिसाद दिला तर विश्वातील सर्वांचीच घरे सुखी होऊ शकतील नाही का?

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========