Sunday, February 1, 1998

कस्तुरी

ऑफिसहून हे जरा खुशीतच आले. "अगं ऐकलंस का? आई बाबा येणार आहेत चार दिवसांनी."

"हो का!" मी त्यांना साथ देत म्हणाले. दोघेही यात्रेला जाता जाता एक दिवस आमच्याकडे राहून जाणार होते. ते येणार म्हणताच माझं स्त्री मन लगेचच स्वयंपाकघरात चक्कर मारून आलं. मी सहज म्हणाले, "ते आल्यानंतर श्रीखंड-पुरीचा बेत करू. चक्का आणा, बाकीचं मी घरी करेन. " पण हे म्हणाले, "छे, छे, विकतचं काही नको आणायला. आई-बाबांना पुरण पोळ्या आवडतात. त्याच कर."

"अहो, असं काय करता? पुरणा वरणाचा स्वयंपाक म्हणजे नसता पसारा! साधं सोईचं करू काही तरी." मी इतरही पदार्थ सुचविले. पण यांचं आपलं एकच पालुपद, पुरणाच्या पोळ्या! शेवटी माझा नाईलाज झाला.

लग्नानंतर आमचं गावी जाणं जरी वारंवार होत असलं तरी आई-बाबा मात्र प्रथमच आमच्याकडे येत होते. दोघांचीही भारी शिस्त होती हे मला ठाऊक होतं. मी घराची साफसफाई केली. पुरणाचा स्वयंपाक म्हणजे मला आत्तापासूनच टेन्शन आलं होतं. शेजारच्या काकूंना चार जणांचा अंदाज विचारला. त्यांनी सांगितलं, "अगं आदल्या दिवशी पुरण तयार कर नि फ्रीजमध्ये ठेवून दे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुझी घाई व्हायची नाही." हे ऐकून मला जरा हायसं वाटलं. पण नेमकं आमचं बोलणं यांनी ऐकलं व म्हणाले, 'तसलं शिळं आईला चालत नाही हे तुला माहीत आहे ना?" मी गप्प बसले. शेवटी आदल्या दिवशी सगळी सगळी तयारी करून ठेवली.

हे घरी आल्यावर  म्हणाले, "अगं कुमी पण येणार आहे हं आईबरोबर."

झाऽऽऽलं ऽऽ!  माझं टेन्शन आणखीनच वाढलं. दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत सगळे यायचे होते. यांनी त्या दिवशीची रजाच टाकली होती. त्यामुळे रात्री नुसते घोरत होते. मला मात्र बराच वेळ डोळा लागला नव्हता. एकटीनं कधीच पोळ्या केल्या नव्हत्या. शेवटी पहाटे चारलाच उठले, तसे चाहुलीने हे जागे झाले व म्हणाले, "अगं इतकी घाई काय?  झोप." "छे, हो उठायला हवं," असं म्हणत मी तडक स्वयंपाकघरात शिरले. पटकन् पुरण शिजायला टाकलं व नंतर सगळं उरकलं. पुरणयंत्रावर वाटून साखर टाकून ढवळायला लागले. पण काही केल्या आटून येईना. काय करावे सुचेना. यांची नजर चुकवून काकूंकडे पळाले. "काकू, अहो पुरण फार पातळ झालंय." "अगं, त्यात काय? जरा जास्त वेळा चटका दे, आटून येईल. पाणी नीट निघालं नसेल."

मग पुन्हा ते काम सुरू झालं.

दुसरीकडे भाताचा कुकर लावला. पण अजून थोडी वाफ येते न येते तोवर गॅस संपला. अरे देवा, आज जणू सारेच माझी परीक्षा पाहत होते. काकूंकडून स्टोव्ह आणला. प्रयत्न करून देखील पेटेना म्हणून यांना पाहायला सांगितलं, तर स्टोव्हच्या आधी हेच पेटले. काही प्लॅनिंग नाही. योजना नाही वगैरे व्याख्यान देत स्टोव्ह पेटवून दिला. खरं तर यात माझी काय चूक? पण हे असलं आपल्या भारतीय कुटुंबपद्धतीत चालतंच! मग जरा नरमाईनंच यांना गॅसच्या दुकानी फोन करायला सांगितला. मला मात्र माझ्या बालपणाची कविता आठवत होती-

'भात केला. कच्चा झाला. वरण (नव्हे पुरण) केलं. पातळं झालं.'

माझी इतर सगळी सगळी कामं झाली पण असून गॅसचा पत्ता नव्हता. मग यांनी स्वतः जाऊन गॅस सिलेंडर आणला, म्हटलं आता पोळ्यांना तवा टाकावा. तोवर पुन्हा यांची चहाची ऑर्डर आली. आयती बसून ऑर्डर सोडायची नुसती! इकडे माझी नुसती घालमेल चालली होती. शेवटी पोळ्यांना सुरुवात केली. पहिली पोळी लाटली, तव्यात टाकताना फाटली. दुसरी पोळी तव्यावर टाकली अन् बेल वाजली म्हणून बाहेर गेले तर येईपर्यंत करपून गेली. छे, छे जीव नकोसा झाला. यांचा इतका राग येत होता. कोणत्या जन्माचा सूड उगवत होते कोण जाणे. चांगला आयता चक्का आणा सुटसुटीत होईल म्हणत होते. पण यांना हव्या होत्या ना पुरणाच्या पोळ्याच!

धडपडून का होईना नंतरच्या बऱ्यापैकी जमल्या. एवढ्यात शेजारची रुपा आली. माझी चाललेली त्रेधा पाहून म्हणाली, "काय हे ऽऽऽ? अगं बाजारात हवं ते मिळतं अन् ते सोडून ही नसती उठाठेव कशासाठी? फारच बारकावा बुवा तुमचा!" रुपाचा हेवा वाटला मला. पण काय करणार?...

मंडळी आली. अंघोळी, चहा पाणी झाल्यावर आईंनी सारं घर पाहिलं. म्हणाल्या, "छान लावलंस हो घर! "

आत मी व वन्संनी पानं वाढायला घेतली. सगळे एकदमच बसलो. मनात जरा धाकधूकच होती. जेवण निम्मं झालं तसं आई म्हणाल्या, "झक्कास झालाय गं स्वयंपाक सूनबाई!"

मामंजीसुद्धा आवडीनं जेवत होते. आई म्हणाल्या, "बरं झालं बाई पुरण टाकलंस ते. नाहीतर हल्ली सगळं विकतचं! ती गुलाबजामची पाकिटं काय नि तो चक्का काय! घरी करायलाच नको. "

"अगं आई, बदलत्या काळाबरोबर बदलायला नको का?" वन्सं म्हणाल्या.

"हो नां, बदलायलाच हवं. वेळ, प्रसंग, गरजेनुसार त्याचा उपयोग करायला हवा एवढंच! पण हल्ली नको इतकं त्याचं स्तोम माजलंय ना, त्याचं वाईट वाटतं गं! हे बघ, घरी थोडेसे कष्ट पडतात खरंय, पण घरचं ताजं, शुद्ध व काटकसरीनं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हातचं साऱ्या कुटुंबीयांच्या पोटात गेल्याचं वेगळंच समाधान लाभतं..." असं म्हणतच आईंनी गावाकडून येताना आणलेले माझ्या व यांच्या आवडीचे मोतीचूरचे लाडू व कडबोळी आग्रहाने वाढली.

उतारवयातील त्यांच्या आठवणीचे व कष्टाचे आश्चर्य तर वाटलेच; त्याचबरोबर गेल्या दोन-तीन दिवसांतील माझ्या विस्कटलेल्या विचारांची व संकुचित मनोवृत्तीची शरम वाटली...

हे मात्र माझ्याकडे पाहून मिष्किलपणे हसत होते. वन्सं म्हणाल्या, "वैनी, एकटीनंच केलंस ना सगळं, थकली असशील, थोडंसं बैस आता. बाकीचं मी पाहते." तेवढ्यात मामंजी जेवण संपवून 'अन्नदाता सुखी भव' असं म्हणत उठले. माझा सारा शीण कुठल्या कुठे पळून गेला. गप्पा मारताना मी मोकळ्या मनाने पुरण पोळीचा किस्सा साऱ्यांना सांगितला.

रात्री ९ वाजता सर्वजण निघाले, तसे हे म्हणाले, "अगं आई, हिच्या हातच्या पोळ्या खाल्ल्यास तेव्हा ओवा देऊ का?" सगळे खळखळून हसले.

आई-बाबांना नमस्कार करीत मी म्हणाले, "येताना पुन्हा या बरं का!" बाबा म्हणाले "अवश्य येऊ, पण एका अटीवर!" "कोणती?" मी म्हणाले, "तू पुन्हा पुराणाच्या पोळ्या करायच्यास." तसे सारे पुन्हा हसायला लागले.

मामंजी असं म्हणून गेले खरं, पण माझं मन निराळ्याच दिशेने धावू लागलं. खरं तर आज केवळ यांच्या हट्टाखातर, नाईलाज म्हणून की पोळ्या केल्या होत्या. पण ते एका परीनं बरंच झालं. दगदग, थोडा त्रास झाला खरा; पण अनुभव सुखद वाटला. जेवताना प्रत्येकाच्याच विशेषतः यांच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसत होतं. बऱ्यापैकी का असेना, पण घरचं, स्वतः केलेलं होतं म्हणून तर ते समाधान नसावे ना?

आयुष्याच्या साथीदाराने माझ्या कष्टाची अशी निखळ पोहोच दिली तर मग सुखी संसाराची वेगळी व्याख्या करायची आवश्यकताच काय? वाटलं की आपण उगाचच साध्या साध्या गोष्टीतही वैयक्तिक सोईच्या व रुपासारख्या मैत्रिणी रुजवू पाहत असलेल्या आरामाच्या खुळ्या कल्पनेला बळी पडून घरातलं घरपण हरवून बसतो आणि त्यातून मिळणारा सहज आनंदही!

आपली अवस्था मृगासारखी झालीय खरी. 'कस्तुरी' नाभीतच पण आकलन न झाल्याने त्याच्या प्राप्तीसाठी सैरभैर धावणाऱ्या मृगासारखी!

छे, चुकतंच आपलं, तेव्हा ठरविलं हे सारं आता संपवायचं आणि घरातला सहज निर्मळ आनंद जोपासायचा, आपापसांतला विरळ होत चाललेला संवाद साधायचा, त्यासाठी धडपडायचं. आई-बाबांसारखं...

साध्याच प्रसंगातून झालेल्या वैचारिक मंथनानं आणि कस्तुरी शोधानं वेगळंच असं समाधान वाटू लागलं. त्या सुखद सुगंधित अनुभूतीत डोळा कसा लागला हे समजलंच नाही.

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

1 comment:

Prashant said...

वाह वाह!
सुंदरच....
आपले प्रेम आपल्या कुटुंबियांवर असणे महत्वाचे. मग थोड्या जास्त श्रमाचे काही वाटत नाही